लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी देशभरातील पाच राज्यांवर लक्ष केंद्रित आहे. यात उत्तर प्रदेश ८० जागा, महाराष्ट्र ४८, पश्चिम बंगाल ४२, बिहार ४०, तमिळनाडू ३९ अशा या जवळपास २०० जागांचा समावेश आहे. देशात उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. महाविकास आघाडीने राज्यातील बहुसंख्य जागांवर एकमत झाल्याचा दावा केला आहे. अर्थात कोणत्या जागा कुणाकडे हे जाहीर केले नाही. तर दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून खडाखडी सुरू आहे. भाजप आघाडीत आता अजित पवार गटाची भर पडलीय. गेल्या वेळी शिवसेनेशी युतीमध्ये भाजपने २५ जागा लढल्या होत्या. तर शिवसेनेचे २३ उमेदवार होते. आता प्रत्येक जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू झालीय. अर्थात वरिष्ठ नेते हे मान्य करीत नाहीत, पण कार्यकर्ते आग्रही आहेत. भाजप आघाडीत रिपब्लिकन पक्ष, जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पक्ष, याखेरीज सदाभाऊ खोत, बच्चू कडू यांचे पक्ष सामील आहेत. जागावाटपात साऱ्यांचेच समाधान होईल हे अशक्य दिसते.

भाजप अधिकाधिक जागांवर आग्रही

शिवसेनेत फूट पडल्याने अधिकाधिक जागांसाठी भाजप आग्रही आहे. विशेषत: विदर्भात सर्व दहा जागा लढवण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे सांगितले जाते. राज्य भाजपमधील प्रमुख नेते विदर्भातून येतात. गेल्या वेळी भाजपने येथील पाच जिंकल्या होत्या तर शिवसेनेला तीन जागा मिळाल्या होत्या. मोदींच्या नेतृत्वात युतीला यश मिळाले. आता राज्यातील परिस्थिती बदलली असून, सर्व दहा ठिकाणी भाजपने उमेदवार द्यावेत असा प्रस्ताव जिल्हा शाखांनी दिला आहे. विदर्भात २०१९ मध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जागी भाजप विजयी झाले. तर रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम या ठिकाणी सेनेला यश मिळाले. चंद्रपूरमध्ये काँग्रेस तर अमरावतीत अपक्ष नवनीत राणा यांची सरशी झाली. शिंदे गट तसेच अजित पवार गटाचे विदर्भात फारसे संघटन नाही. अशा वेळी भाजप मित्र पक्षांना किती जागा सोडणार हे स्पष्ट नाही. मात्र सर्व दहा जागा भाजपला मिळणार नाहीत. गेल्या वेळी जिंकलेले शिवसेनेचे खासदार शिंदे गटात आहेत. त्यामुळे या जागांवर रस्सीखेच होणारच. विरोधात महाविकास आघाडीत विदर्भातील बहुसंख्य जागा आता काँग्रेस लढेल हे स्पष्ट आहे.

हेही वाचा : मालदीवच्या विकासात भारताचं योगदान; विमानतळ-पाणी पुरवठा-कॅन्सर हॉस्पिटल- क्रिकेट स्टेडियम

ठाण्यावर दावा

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे येथून प्रतिनिधित्व करतात. मध्यंतरी भाजपने ठाण्यावर दावा केल्याने चर्चा सुरू झाली. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे अशा भाजपमधील अभ्यासू व्यक्तींनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नंतरच्या काळात शिवसेनेचा प्रभाव वाढून, हा मतदारसंघ युतीत भाजपकडून गेला. शिवसेनेचे ठाणे हे एक नाते झाले. मात्र आता दबावतंत्राचा वापर करत भाजपने ठाण्यावर दावा केलाय. त्यासाठी नवी मुंबई तसेच मिरा-भाईंदर येथील भाजपच्या प्रभावाचा दाखला दिला जातोय. ठाण्यावर दावा केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली.

तटकरेंना विरोध

ठाण्याप्रमाणेच रायगडमध्ये भाजपने सुनील तटकरे उमेदवार नकोत अशी भूमिका घेतलीय. तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपने शेकापमधून अनेक नेते आणले. सहापैकी दोन आमदार जिल्ह्यात भाजपचे असून, ही परिस्थिती अनुकूल असल्याचा पक्षाचा दावा आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीमधील पक्ष स्वतंत्र लढल्याने फटका बसून, महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले. सुनील तटकरे हे गेल्या वेळी राष्ट्रवादीतून निवडून आलेत. त्यामुळे विद्यमान जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडेल ही शक्यता कमीच. त्यात तटकरे यांचे सर्वपक्षीयांना सांभाळून घेण्याचे कौशल्य आहे. रायगडचा तिढा महायुतीला सोडवावा लागेल.

हेही वाचा : विश्लेषण: मेट्रो पांढरा हत्ती ठरतेय का?

सातारा, परभणी, हातकणंगले…

सातारा मतदारसंघात शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत. पोटनिवडणुकीत भाजपच्या उदयराजेंना पराभूत करून ते विजयी झाले. त्यापूर्वी उदयनराजे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. आता अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केलाय. भाजपही स्पर्धेत आहे. याखेरीज शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांनीही तयारी चालवली आहे. साताऱ्यात आघाडीतील घटक पक्षांमध्येच या जागेवरून संघर्ष सुरू आहे. परभणीतही स्पर्धा आहे. येथे ठाकरे गटाचे खासदार आहेत. अजित पवार तसेच भाजपमध्ये या जागेसाठी चुरस दिसते. हातगकणंगले मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार आहेत. येथेही भाजपचे लक्ष्य आहे. एकूणच पश्चिम महाराष्ट्रात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश देऊन भाजपने ताकद वाढवल्याने अनेक दावेदार निर्माण झालेत. त्यामुळेच भाजपची अधिकाधिक मतदारसंघांत लढण्याची इच्छा आहे. मात्र युती म्हटल्यावर जागांची देवाणघेवाण होणार. भाजपला महाराष्ट्रात गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा गमावून चालणार नाही. २०१९ मध्ये शिवसेना-भाजपने ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. यंदा या जागा राखण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा : अयोध्या राम मंदिर: प्राणप्रतिष्ठा काय असते? काय सोहळा असतो आणि काय विधी असतात?

छोट्या पक्षांचे काय?

बच्चू कडू यांनी नुकतीच भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली. रिपाइंनेदेखील काही जागा लोकसभेला मागितल्या आहेत. एकीकडे भाजप मित्रपक्षांच्या जागांवर दावा करत असताना, आता छोट्या पक्षांना किती जागा देणार, हा मुद्दा आहे. जागा वाटपात सर्वांचे समाधान होणे कठीण असले तरी, घटक पक्ष विरोधी गोटात जाणार नाहीत याची खबरदारी महायुतीमधील मोठा भाऊ म्हणून भाजपला घ्यावी लागेल. महाविकास आघाडीने व्यापक सामाजिक समीकरण निर्माण करण्यात यश मिळवले आहे. ते महायुतीपुढे मोठे आव्हान आहे. यामुळे भाजपलाही राज्यात दक्ष राहावे लागेल. त्यामुळे जिल्हा पातळीवर कार्यकर्ते जरी जागांवर दावे करीत असले तरी, विजयाची शक्यता हाच जागा सोडताना अंतिमत निकष लावला जाईल हे स्पष्ट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

hrishikesh.deshpande@expressindia.com