-अन्वय सावंत‘‘मी अपघाताने फिरकीपटू झालो. मला कायमच फलंदाज व्हायचे होते. मात्र, परिस्थिती अशी निर्माण झाली की मला फिरकी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागले. मी कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरेन याबाबत अनेकांना खात्री नव्हती. मात्र, १०-१२ वर्षे खेळल्यानंतर मी बहुधा स्वतःला सिद्ध केले आहे,’’ असे भारताचा प्रसिद्ध ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन कसोटी कारकीर्दीत ५०० बळींचा टप्पा गाठल्यानंतर म्हणाला. क्रिकेटमधील सुरुवात फलंदाज म्हणून केल्यानंतर अश्विनने पुढे मध्यम गती गोलंदाजी करून पाहिली. मात्र, कमी वयातच पाठीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला ऑफ-स्पिन गोलंदाजीकडे वळावे लागले. परंतु हे अश्विनसह भारतीय क्रिकेटच्याही पथ्यावर पडले. यापूर्वी कोणत्याही भारतीय ऑफ-स्पिनरला न जमलेली कामगिरी अश्विनने करून दाखवली. त्याने कसोटीत ५०० बळी टिपण्याची किमया साधली. त्याची ही कामगिरी किती खास आहे आणि इथवरच्या प्रवासात त्याने कोणकोणत्या आव्हानांवर मात केली, याचा आढावा. अश्विनचे बळींचे पंचशतक का खास ठरते? इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात झॅक क्रॉलीला बाद करत अश्विनने कसोटी कारकीर्दीत ५०० बळींचा टप्पा गाठला. त्याचे हे बळींचे पंचशतक खास ठरते, कारण अशी कामगिरी करणारा तो भारताचा केवळ दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी माजी लेग-स्पिनर अनिल कुंबळे (६१९) यालाच ही कामगिरी करता आली होती. भारताला दिग्गज फिरकीपटूंचा मोठा वारसा आहे. चंद्रशेखर, वेंकटराघवन, प्रसन्ना, बेदी यांनी एक काळ गाजवला. पुढे कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी भारतीय फिरकीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. मात्र, कुंबळेव्यतिरिक्त यापैकी कोणालाही ५०० कसोटी बळी टिपता आले नाहीत. ही कामगिरी अश्विनने करून दाखवली. विशेष म्हणजे त्याने ५०० कसोटी बळींचा टप्पा कुंबळेपेक्षाही कमी सामन्यांत गाठला. कुंबळेला हा टप्पा गाठण्यासाठी १०५ कसोटी सामने लागले होते, तर अश्विनने ९८व्या कसोटीतच ही कामगिरी केली. हेही वाचा >>> गुगलने लाँच केले नवे AI मॉडेल जेमिनी १.५; अनेक अवघड कामे होणार सोपी, भारतातही सेवा सुरू कसोटी कारकीर्दीत ५०० बळी मिळवणारा कितवा गोलंदाज? कसोटी कारकीर्दीत ५०० बळी मिळवणारा अश्विन हा जागतिक क्रिकेटमधील केवळ नववा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन (८०० बळी), शेन वॉर्न (७०८), जेम्स अँडरसन (६९६), कुंबळे (६१९), स्टुअर्ट ब्रॉड (६०४), ग्लेन मॅकग्रा (५६३), कोर्टनी वॉल्श (५१९), नेथन लायन (५१७) यांनाच अशी अलौकिक कामगिरी करता आली आहे. यापैकी अश्विनसह अँडरसन आणि लायन अजून सक्रिय आहे. इतके यश मिळवूनही अश्विनला वारंवार टीकेला का सामोरे जावे लागते? सुशिक्षित घरातील आणि स्वतः अभियांत्रिकीची पदवी घेतलेला अश्विन विचारी क्रिकेटपटू मानला जातो. आपला प्रत्येक बळी आणि विक्रम त्याला तोंडपाठ आहे. मात्र, आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि निर्भीड व्यक्तिमत्त्वामुळे त्याला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. तसेच मैदानावरील त्याच्या कामगिरीबाबतही अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. तो केवळ भारतात किंवा फार तर आशियाई उपखंडात यशस्वी ठरू शकतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळताना मात्र भारतीय संघाला अश्विनची काहीच उपयुक्तता नाही अशी वारंवार त्याच्यावर टीका केली जाते. याच विचारसरणीतून भारतीय संघाकडूनही त्याला दुय्यम वागणूक दिली जाते. परदेशात वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर जेव्हा केवळ एक फिरकीपटू घेऊन खेळण्याची वेळ येते, तेव्हा अश्विनऐवजी डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला प्राधान्य दिले जाते. फलंदाज म्हणून जडेजा सरस असला, तरी अश्विननेही कसोटीत पाच शतके केली आहेत याचा अनेकांना विसर पडतो. अश्विनसाठी कोणता काळ खडतर होता? २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अश्विनसाठी २०१८-१९ चा काळ फार आव्हानात्मक होता. त्यावेळी अश्विनला दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळे कामगिरी खालावली. तसेच २०१८ च्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना त्याला चारपैकी केवळ एका सामन्यात संधी देण्यात आली. याविषयी बोलताना अश्विन म्हणाला, ‘‘२०१८-१९चा काळ माझ्यासाठी खूप अवघड होता. मी सहजासहजी निराश होत नाही. मात्र, त्यावेळी नक्की काय करावे हे मला कळत नव्हते. मी काही वर्षांपूर्वीच ‘आयसीसी’च्या सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरलो होतो. विश्वातील आघाडीच्या खेळाडूंमध्ये माझी गणना केली जात होती. मात्र, मला एक-दोन दुखापती झाल्या. कामगिरी खालावली. त्यावेळी माझी कारकीर्द संपली असे मला वाटले होते. मात्र, त्यानंतर करोना महासाथीमुळे पूर्ण क्रिकेटविश्वच थांबले आणि मला मागे वळून पाहण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी क्रिकेटकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो. क्रिकेटवरील प्रेम मी हरवत चाललो होतो, पण ते मला पुन्हा मिळाले. त्यानंतर माझी गाडी पुन्हा रुळांवर आली.’’ हेही वाचा >>> विश्लेषण : इराणने अंटार्क्टिका खंडावर केलेला दावा जगभरातील देशांची चिंता वाढवणार? मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरी कशी आहे? देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली असली, तरी ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना मिळवलेल्या यशामुळे अश्विन प्रकाशझोतात आला आणि त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे पांढऱ्या चेंडूने गोलंदाजी करतानाही अश्विनने यापूर्वी बरेच यश मिळवले आहे. त्याच्या नावे ११६ एकदिवसीय सामन्यांत १५६ बळी, तर ६५ ट्वेन्टी-२० सामन्यांत ७२ बळी आहेत. तो २०११च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या आणि २०१३च्या चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. सुरुवातीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा प्रभाव त्याच्या कसोटीतील गोलंदाजीवर दिसायचा. त्याने कॅरम बॉल, टॉपस्पिन असे विविध चेंडू टाकण्याचे प्रयोग करून पाहिले. मात्र, सामन्यागणिक त्याच्या गाठीशी अनुभव जमा होत गेला आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट व कसोटीतील वेगळेपण त्याला उमगले. त्यानंतर तो अधिक परिपक्व झाला आणि त्याला सातत्याने यश मिळू लागले.