जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमध्ये तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचं शुक्रवारी (६ जून) उद्घाटन केलं आहे. हा रेल्वे पूल तयार झाल्यामुळे तो भारताच्या विकासातील एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. खरं तर वैशिष्ट्यपूर्ण अशा बांधकामामुळे चिनाब नदीवर या पुलाचं बांधकाम करणं हे सर्वात मोठं आव्हान मानलं जात होतं.
चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. काश्मीर खोरे आणि उर्वरित भारतादरम्यान सर्व हवामानात रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. चिनाब पूल चिनाब नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर (१,१७८ फूट) उंच आहे, जो पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. या प्रदेशाच्या कठीण भूप्रदेशामुळे पुलाचे बांधकाम हे एक मोठे आव्हान होते. सलग १७ वर्ष माधवी या या प्रकल्पाशी निगडीत प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
कोण आहेत माधवी लता?
- प्राध्यापक माधवी लता यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास इथून भू-तंत्रज्ञान अभियांत्रिकीमध्ये पीचएचडी केलं आहे
- २००४ मध्ये माधवी आयआयटी गुवाहाटी इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.
- आयआयएससीमध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला फॅकल्टी सदस्य
- चिनाब पूल उभारणीमध्ये लता यांचं १७ वर्षांचं महत्त्वपूर्ण योगदान
आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मध्ये त्यावेळी महिलांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह मिळावं यासाठीही माधवी यांना संघर्ष करायला लागला होता.त्यावेळी विभागात केवळ पुरुष कर्मचारी असल्यामुळे महिलांसाठी वेगळी शौचालये नव्हती. फक्त पुरुषांसाठीच शौचालये होती. भू-तंत्रज्ञान अभियांत्रिकी इमारतीत महिलांसाठी शौचालय मिळवण्यासाठी मला खरोखर संघर्ष करावा लागला, असे आयआयएससीने त्यांच्या वेबसाइटवर लता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिनाब पुलाचे उद्घाटन केल्यानंतर लगेचच आयआयएससीकडून एक्सवर लता यांचे कौतुक करण्यात आले. “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या चिनाब पुलात प्राध्यापक माधवी लता आणि त्यांच्या टीमच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे. टीमने उतारांची स्थिरता, पायाची रचना आणि बांधकाम, उतार स्थिरीकरण प्रणालीची रचना, संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी रॉक अँकर यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर काम केले.”
भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनीदेखील चिनाब पूल बांधण्यात प्राध्यापक लता यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. “या अभियांत्रिकी चमत्कारातील तुमची भूमिका तरुण मनांना प्रामुख्याने या क्षेत्रातील महिलांना राष्ट्र उभारणीत नेतृत्व करण्यासाठी प्रेरित करते”, असे त्यांनी म्हटले आहे. लता या सध्या सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजीच्या अध्यक्षा आहेत. गेल्या काही वर्षात त्यांना प्रतिष्ठेच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. २०२१ मध्ये लता यांना इंडियन जिओटेक्निकल सोसायटीकडून सर्वोत्कृष्ट महिला भू-तंत्रज्ञान संशोधक पुरस्कार मिळाला. २०२२ मध्ये त्यांनी भारतातीत STEM अर्थात (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित) या क्षेत्रातील टॉप ७५ महिलांमध्ये स्थान मिळवले.
चिनाब पूल बांधण्यात माधवी लता यांची भूमिका
बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक जी. माधवी लता यांनी चिनाब पूल प्रकल्पावर भू-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून १७ वर्षे काम केले. रॉक इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञ असलेल्या लता यांना उत्तर रेल्वे आणि चिनाब पूल प्रकल्प कंत्राटदार अफकॉन्स यांनी उतार स्थिरीकरण आणि पुलाच्या पायावर सल्ला देण्यासाठी नियुक्त केले होते. हा पूल २२० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने येणाऱ्या वाऱ्यांसह अतिशय कठोर नैसर्गिक परिस्थितींना तोंड देऊ शकेल याची खात्रीदेखील करण्यात आली.
१२० वर्षांच्या आयुष्यमानासह चिनाब पूल २६० किमी प्रतितास प्रचंड वेगाने वाहणारे वारे, टोकाचं तापमान, भूकंप तसंच पाण्याची पातळी वाढणे यासारख्या गंभीर संकटांचा हा पूल सामना करू शकेल. चिनाब पुलाचे डिझाइन आणि बांधकाम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, दक्षिण कोरियास्थित अल्ट्रा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग कंपनी आणि व्हीएसएल इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाने करण्यात आले आहे.
डेक्कन हेराल्डशी बोलताना लता म्हणाल्या की, “उतार स्थिरीकरण आणि पाया यासाठी आयआयएससी सल्लागार होती, तर स्टील आर्च बनवण्यात परदेशी कंपन्या सहभागी होत्या. पुलाचे नियोजन २००५ मध्ये सुरू झाले आणि २०२२ मध्ये पूर्ण वेगवान गाड्यांसह चाचणी घेण्यात आली, तेव्हा ते काम पूर्ण झाले.” पुलाच्या आधार नसलेल्या स्टील कमानीची लांबी सुमारे अर्धा किलोमीटर आहे. ती डाव्या आणि उजव्या बाजूच्या खांबांवर, उतारांवर आठ खांबांसह टेकलेली आहे.
बांधकामादरम्यान प्राध्यापक लता यांच्या टीमने डिझाइन-अॅज-यू-गो दृष्टिकोनाचा अवलंब केला होता. म्हणजेच त्यांना भग्न खडक, लपलेल्या पोकळ्या आणि वेगवेगळ्या खडकांच्या गुणधर्मांसारख्या भूगर्भीय परिस्थितीनुसार रिअल टाइममध्ये जुळवून घ्यावे लागले, जे सुरुवातीच्या सर्वेक्षणांमध्ये स्पष्ट नव्हते.
गेल्या महिन्यात डॉ. लता यांनी इंडियन जिओटेक्निकल जर्नलच्या महिला विशेष अंकात प्रकाशित केलेल्या “डिझाइन अॅज यू गो: द केस स्टडी ऑफ चिनाब रेल्वे ब्रिज” या लेखात गेल्या १७ वर्षांत पूल बांधताना त्यांना आलेल्या आव्हानांचा उल्लेख केला होता. “चिनाब पुलासारख्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या चमत्कारिक बांधकामामुळे नियोजनापासून ते पूर्ण होईपर्यंत अनेक आव्हाने उभी राहिली. सतत विकसित होत असलेल्या भूगर्भीय परिस्थिती लक्षात घेता निश्चित परिमाण आणि पूर्व-निर्धारित उपायांसह कठोर डिझाइन शक्य झाले नसते,” असे त्यांनी या लेखात नमूद केले. “या प्रकल्पात स्वीकारलेल्या डिझाईन्स-अॅज-यू-गो दृष्टिकोनामुळे १७ वर्षांच्या बांधकाम कालावधीत प्रत्येक टप्प्यात आलेल्या गंभीर आव्हानांना पार करत पुलाचे बांधकाम शक्य झाले,” असे प्राध्यापक लता यांनी सांगितले. उंच खडकांमधील विसंगती आणि तीव्र उतारांमुळे, चिनाब पुलाच्या कमानीच्या जोड्या आणि उतारांवरील खांबांसाठी पाया बांधणे हे एक सर्वात मोठे आव्हान होते. लता आणि इतर प्रकल्प अभियंत्यांनी शोधलेला उपाय म्हणजे मजबुतीकरणासाठी दगड आणि स्टीलच्या रॉडच्या तुकड्यांसह सिमेंट ग्राउटिंग तंत्राचा वापर करणे. अशाप्रकारे १७ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर पंतप्रधानांनी या पुलाचे उद्घाटन केले