जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. पाकिस्तान आपल्या कृतींनी ही आग आणखी भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताबरोबरच्या तणावादरम्यान पाकिस्तानने गेल्या तीन दिवसांत जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. पूर्वी पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी (५ मे) पाकिस्तानने ‘फतेह’ मालिकेतील क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांसाठी व्हिसा निलंबित करण्यासह अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे. क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण हे पाकिस्तानचे भारताविरुद्धचे चिथावणीखोर पाऊल म्हणून पाहिले जात आहे. पाकिस्तानने चाचणी केलेली ही क्षेपणास्त्रे कोणती आणि ती किती घातक? त्याविषयी जाणून घेऊ.

भारताबरोबरच्या तणावादरम्यान पाकिस्तानने गेल्या तीन दिवसांत जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पाकिस्तानच्या फतेह क्षेपणास्त्राची चाचणी

पाकिस्तानने सोमवारी १२० किलोमीटर पल्ल्याच्या फतेह क्षेपणास्त्राची चाचणी केली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचे वृत्त ‘डॉन’ने पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)च्या माहितीचा हवाला देऊन दिले आहे. “या प्रक्षेपणाचे उद्दिष्ट सैन्याची ऑपरेशनल तयारी सुनिश्चित करणे, क्षेपणास्त्राची प्रगत नेव्हिगेशन प्रणाली आणि अचूकता, तसेच प्रमुख तांत्रिक बाबींची पडताळणी करणे होते,” असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले की, पाकिस्तानच्या सध्या सुरू असलेल्या लष्करी सराव ‘इंडस’चा भाग म्हणून हे प्रक्षेपण करण्यात आले.

जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी प्रक्षेपणात सहभागी झालेल्या सैन्याचे, शास्त्रज्ञांचे व अभियंत्यांचे अभिनंदन केले. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने म्हटले, “त्यांनी पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेविरुद्ध कोणत्याही आक्रमणाला हाणून पाडण्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशनल तयारी आणि तांत्रिक कौशल्यावर संपूर्ण विश्वास व्यक्त केला.” पाकिस्तानने पूर्वी दावा केला की, भारत लष्करी घुसखोरीची योजना आखत आहे. अशा कोणत्याही घटनेला प्रतिसाद देण्याचा इशारा त्यांनी आपल्या सैन्याला दिला असल्याची माहितीही इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दिली.

फतेह क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य

गेल्या वर्षी पाकिस्तानने फतेह-२ रॉकेट प्रणालीची चाचणी केल्याची माहिती आहे. हे एक मार्गदर्शित लहान पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र फतेह-१ नंतर प्रगत उपकरणांसह तयार करण्यात आले आहे. फतेह-१ चा पल्ला १५० किलोमीटर आहे. ‘द डिप्लोमॅट’च्या लेखानुसार, फतेज-२ क्षेपणास्त्राचा पल्ला ४०० किलोमीटर असून, ते अधिक अचूकतेने लक्ष्य गाठू शकते. क्षेपणास्त्राचा पल्ला S-४०० हवाई संरक्षण प्रणालींसारख्या मोबाईल लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम करते. या अहवालात असे म्हटले आहे की, पाकिस्तानने भारताच्या मालकीच्या रशियन-निर्मित एस-४०० ‘ट्रायम्फ’ हवाई संरक्षण प्रणालीला टक्कर देण्यासाठी फतेह-२ क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक उड्डाण नियंत्रण तंत्रज्ञान आहे. हे रॉकेट अत्याधुनिक एव्हियोनिक्स, अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टीम व अद्वितीय उड्डाण मार्गाने सुसज्ज असल्याचे पाकिस्तानच्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. कमी उत्पादन आणि ऑपरेशनल खर्चामुळे ते पाकिस्तानकडे असलेल्या शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा (एसआरबीएम) आघाडीवर आहे. ७.५ मीटर लांबी असलेले हे रॉकेट ३६५ किलोग्राम वजनाचे वॉरहेड वाहून नेऊ शकते. ‘जेन्स डिफेन्स वीकली’च्या माहितीनुसार, यातील नेव्हिगेशन सिस्टीममुळे लाँचर उच्च अचूकतेने लक्ष्यांवर हल्ला करण्यास आणि कोणत्याही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला पराभूत करण्यास सक्षम ठरते, असे आयएसपीआरने म्हटले होते.

अब्दाली शस्त्र प्रणाली किती घातक?

पाकिस्तानची अब्दाली शस्त्र प्रणाली ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता ४५० किलोमीटरपर्यंत आहे. शनिवारी (३ मे) पाकिस्तानकडून त्याची चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाचे उद्दिष्ट सैन्याची ऑपरेशनल तयारी सुनिश्चित करणे, क्षेपणास्त्राची प्रगत नेव्हिगेशन प्रणाली आणि तांत्रिक पॅरामीटर्सची पडताळणी करणे हे होते,” असे आयएसपीआरने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानमधील विश्लेषकांनी ‘एएफपी’ला सांगितले की, या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण हा भारतासाठी एक इशारा होता. लष्करी विश्लेषक हसन अस्करी रिझवी म्हणाले, “यावरून स्पष्ट होते की, आमच्याकडे भारताचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत. हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी संदेश आहे की, आम्ही चांगली तयारी करीत आहोत.”

नवी दिल्लीतील एका अधिकाऱ्याने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, “बॅलfस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणी म्हणजे भारताविरुद्धच्या शत्रुत्वाच्या मोहिमेत पाकिस्तानने केलेली चिथावणीची कृती. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये बहुधा उड्डाणाचे तीन टप्पे असतात. अमेरिकेतील ‘द सेंटर फॉर आर्म्स कंट्रोल अँड नॉन-प्रोलिफरेशन’ या संस्थेच्या माहितीनुसार, “या क्षेपणास्त्राचा बूस्ट फेज लाँच होताना सुरू होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बूस्ट फेज तीन ते पाच मिनिटे टिकून राहतो. रॉकेट फायरिंग थांबवल्यानंतर मिडकोर्स फेज सुरू होतो. क्षेपणास्त्र त्याच्या रेंजनुसार उंच जाते आणि नंतर पृथ्वीच्या दिशेने येऊ लागते.” टर्मिनल फेज हा याचा शेवटचा टप्पा असतो. या फेजमध्ये म्हणजे वॉरहेड वेगळे होते आणि लक्ष्यावर मारा करते. १८ व्या शतकात अफगाण शासक अहमद शाह अब्दाली याने भारतावर अनेक वेळा आक्रमण केले होते. त्याच्याच नावावरून पाकिस्तानने या क्षेपणास्त्राला नाव दिले आहे. हे क्षेपणास्त्र पारंपरिक आणि आण्विक वॉरहेड वाहून नेऊ शकते.