भारतीय कृषी संशोधन संस्थेतील (IARI) शास्त्रज्ञ आणि निर्यातदारांनी पाकिस्तानमध्ये बेकायदेशीर लागवड करण्यात आलेल्या सुधारित बासमती तांदळाच्या वाणांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच एका युट्यूब व्हिडिओमुळे हे उघडकीस आले. मुलतान, बहावलनगर आणि हाफिजाबाद येथील पाकिस्तानी बियाणे कंपन्यांनी IARI वाणांच्या वैशिष्ट्यांचा प्रचार करणारा व्हिडीओ प्रसारित केला, त्यानंतर ही चोरी उघडकीस आली. ही वाणं भारतीय कृषी संशोधन संस्थेने सातत्यपूर्ण संशोधनातून निर्माण केलेली आहेत. म्हणजेच उत्तम उत्पादनासाठी भारताने तांदळाचे बियाणे निर्माण केले, तेच चोरून पाकिस्तान सध्या चांगले उत्पादन घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: Hazratbal Shrine Development Project काश्मीरमधला हजरतबल विकास प्रकल्प: पंतप्रधान मोदींनी का घेतला पुढाकार? काय आहे इतिहास?

भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीत घट

यावर्षी भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीत एकूण ५ टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र आहे. २०२२-२३ च्या एप्रिल-जानेवारी मध्ये ही निर्यात ३७२.१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. तर यावर्षी ती ३५३.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर आली आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पादनांच्या निर्यातीतही ९.७ टक्क्यांनी घट झाली आहे, ही निर्यात ४३.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून ३९.२ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर आली आहे.

मात्र याच कालावधीत बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. डॉलरच्या मूल्यांकनात २०.२ % ने वाढ झाली तर निर्यातीच्या मालाच्या प्रमाणात १२.३ % नी वाढ झाली आहे. सध्याचा हा ट्रेण्ड कायम राहिला तर २०२४ च्या मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपेपर्यंत ५.५ अब्ज डॉलर (किंवा ४५,५५० कोटी रुपये) मूल्याच्या जवळपास ५० लाख टन बासमती तांदळाची निर्यात होऊ शकते आणि हा आजवरच्या इतिहासातील उच्चांक असेल.

तक्ता १

वरील तक्त्यात इतर तांदळाच्या निर्यातीत घसरण दिसत असली, तरी बासमतीच्या निर्यातीत वाढ होत असल्याचे दाखवले आहे, चालू आर्थिक वर्षात इतर जातीच्या तांदळाची ४.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीची केवळ ११० लाख टनांपेक्षा कमी निर्यात होऊ शकते, जी विक्रमी १७८ लाख टनांपेक्षा कमी आहे. २०२२-२३ मध्ये ६.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीची निर्यात झाली आहे. कारण केंद्राने सर्व पांढऱ्या गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आता फक्त २०% शुल्काच्या अधीन पारबॉइल्ड नॉन-बासमती शिपमेंटला परवानगी दिली जात आहे.

आपल्या शेजाऱ्यांनी नेमके काय केले आहे?

पाकिस्तान नेहमीच भारतासाठी काहीना काही समस्या निर्माण करतो. यावेळी त्यांनी चक्क IARI ने (भारतीय कृषी संशोधन संस्थेने) विकसित केलेल्या बासमती तांदळाच्या सुधारित उच्च-उत्पादक जातींच्या तांदळाच्या बियाणांची चोरी केली आहे. इतकेच नाही तर या बियाणांची लागवड करून त्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. आणि त्याचा प्रचार आणि प्रसार स्वतःचे उत्पादन म्हणून करत आहेत.

नवी दिल्लीतील कृषी संस्थेच्या वाणांनी २०२३ च्या हंगामात सुगंधित तृणधान्य पिकाची लागवड करणाऱ्या भारतातील अंदाजे २.१ दशलक्ष हेक्टरपैकी ८९% क्षेत्र व्यापले होते. पुसा बासमती (PB) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जातींचा देशाच्या $५-५.५ अब्ज वार्षिक बासमती निर्यातीत ९०% पेक्षा जास्त वाटा आहे.

IARI-च्या जातींमध्ये विशेष काय आहे?

पारंपारिक उच्च बासमती वाणांपैकी तारोरी (एचबीसी -१९), देहरादुनी (प्रकार -३), सीएसआर-३० आणि बासमती-३७० – कमी उत्पादन देणारी होती, ही वाणं पेरणीपासून काढणीपर्यंत १५५-१६० दिवसपेक्षा जास्त काळ घेतात आणि प्रति एकर १० क्विंटल भात (भुशासह तांदूळ) उत्पादन मिळते. तर IARI वाण निर्मित पिकांची उंची कमी असते, आणि ती वाणं कमी वेळात जास्त धान्य देतात. १९८९ मध्ये व्यावसायिक लागवडीसाठी प्रसिद्ध झालेली पहिले IARI वाण – पीबी १ हे २५-२६ क्विंटल/ एकर उत्पादन देते आणि १३५-१४० दिवसांत परिपक्व होते.

पीबी-११२१, २०२३ मध्ये बाजारात आले, थोड्या जास्त परिपक्वतेसह (१४०-१४५ दिवस) कमी (२०-२१ क्विंटल) उत्पादन मिळाले. परंतु याची गुणवत्ता जास्त होती — गराच्या भागाची सरासरी लांबी ८ मिमी (तरावरी आणि पीबी १ साठी ७.२-७.४ मिमी विरुद्ध) जी स्वयंपाक करताना २१.५ मिमी (१४-१४.७५ मिमी विरुद्ध) पर्यंत वाढते.

अधिक वाचा: पुलवामा: दहशतवादी हल्ल्याची पाच वर्षे- नक्की काय घडले होते?

यानंतर पीबी-६ (२०१० मध्ये बाजारात आलेल्या पीबी-१ आणि पीबी-११२१ चा क्रॉस) आणि पीबी-१५०९ (२०१३) यांचा समावेश होता. शेवटच्या वाणाचे पीबी-१ इतके उत्पादन मिळाले, परंतु बियाणे ते धान्य हा प्रवासकालावधी केवळ ११५-१२० दिवस आहे. IARI ने नंतर पीबी-११२१ (पीबी-१७१८आणि पीबी-१८८५), पीबी-१५०९ (पीबी-१६९२ आणि पीबी-१८४७) आणि पीबी-६ (PB-१८८६) च्या सुधारित आवृत्त्यांचे देखील अनावरण केले, ज्यात जीवाणू आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता होती

पीबी-११२१ हे २०१३ मध्ये पिके -११२१ सुगंधी वाण म्हणून पाकिस्तानी बाजारात आणण्यात आले. आणि कायनात ११२१ बासमती (‘कायनात’ हा ‘कॉसमॉस’ साठीचा उर्दू शब्द आहे) म्हणून विकले गेले. त्याचप्रमाणे पीबी-१५०९ हे २०१६ मध्ये नोंदणीकृत वाण किसान बासमती म्हणून पुनर्निर्मिती करण्यात आले. अलीकडील पाकिस्तानी बियाणे कंपन्या आणि तथाकथित संशोधन फार्म आणि कृषी सल्लागार यांचे YouTube व्हिडिओ आहेत, ज्यात पीबी-१८४७, पीबी-१८८५ आणि पीबी- १८८६ यासह नवीन IARI वाणांवर चर्चा केली आहे. ही बियाणी भारताच्या बियाणे कायद्यांतर्गत फक्त जानेवारी २०२२ मध्ये अधिसूचित करण्यात आली होती. या व्हिडिओंनीं भारतातील अधिकाऱ्यांना, विशेषतः IARI शास्त्रज्ञांना सतर्क केले आहे.

चिंता कशासाठी?

पाकिस्तानची बासमती निर्यात २०२१-२२ मधील ७.५८ लाख टन (६९४.५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) वरून २०२२-२३ मध्ये ५.९५ लाख टन (६५०.४२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) पर्यंत घसरली होती. ती २०२२-२३ जुलै-फेब्रुवारी महिन्यात ३.६६ लाख टन होती. आता २०२३-२४ जुलै-फेब्रुवारी महिन्यात ४.७२ लाखटन इतकी आहे. म्हणजे वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. तरीही ही वाढ भारताशी बरोबरी करू शकलेली नाही. असे असले तरी, भारताकडे अजूनही काळजी करण्याची अनेक कारणे आहेत.

प्रारंभिक कालखंडात, बासमती तांदळाचे उत्पादन फक्त भारत आणि पाकिस्तानमध्येच घेतले जात होते. पाकिस्तान प्रामुख्याने सुपर बासमती हा लाहोरजवळील काला शाह काकू येथील तांदूळ संशोधन संस्थेने निर्माण केलेली उच्च-उत्पादक वाण (IARI च्या PB-1 प्रमाणे) निर्यात करतो. १९९६ मध्ये बाजारात आलेल्या या जातीने पाकिस्तानला युरोपियन युनियन- युनायटेड किंगडमच्या तपकिरी (पॉलिश न केलेल्या/भुसा नसलेल्या) बासमती तांदळाच्या बाजारपेठेत ६६-७०% वाटा मिळण्यास मदत केली आहे. सप्टेंबर २०२३ पासून नवीन मार्केटिंग वर्षात हा हिस्सा ८५% वर गेला आहे.

अग्रणी भारत

भारत हा बासमती तांदळाच्या बाजारपेठेत अग्रणी आहे. शिवाय, सौदी अरेबिया, इराण, इराक, संयुक्त अरब अमिराती आणि इतर पश्चिम आशियाई देशांमध्ये भारतीय तांदळालाच पसंती दिली जाते. त्याचा संबंध ग्राहकांच्या पसंतीशी संबंधित आहे. भारतीय तांदळासाठी पारबॉइलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे नेहमीच्या पांढऱ्या तांदळापेक्षा हा तांदूळ जास्त काळ शिजवल्यानंतर तुटण्याची शक्यता कमी असते. पण पाकिस्तानातील गिरण्या वाढत्या प्रमाणात पारबॉइलिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत आणि तेथील शेतकरी IARI बासमतीच्या उत्कृष्ट वाणांची लागवड करत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतासाठी ही बाजारपेठेत आव्हानात्मक परिस्थिती उभी राहण्याची चिन्हे आहेत.

सध्या त्यांचे चलन घसरल्यामुळे पाकिस्तान तांदळाची स्वस्त दरात विक्री करणार असून त्यामुळे निश्चितच त्यांना फायदा होणार आहे.

अधिक वाचा: महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

भारताने काय करावे?

भारताने २००१ मध्ये वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा लागू केला. IARI-ची सुधारित बासमती वाणं या कायद्यांतर्गत सर्व नोंदणीकृत आहेत. त्यामुळे या कायद्यानुसार केवळ भारतीय शेतकऱ्यांना पेरणी, जतन, पुन्हा पेरणी, देवाणघेवाण किंवा बियाणे सामायिक करण्याची,त्यांच्यापासून तयार झालेले धान्य घेण्याची परवानगी आहे. परंतु ते देखील ब्रीडरच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाहीत. या प्रकरणात, IARI चे संरक्षित वाणांचे बियाणे विकण्याचीही परवानगी नाही.

याशिवाय भारताच्या बियाणे कायदा, १९९६ नुसार IARI भारतीय बासमती तांदळाच्या जाती भारतीय सीमांच्या आत काही विशिष्ट प्रदेशात लागवड केल्या जातात. याप्रदेशांमध्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश (पश्चिम) आणि जम्मू आणि काश्मीरचे दोन जिल्हे (जम्मू आणि कठुआ) या सात राज्यांचा समावेश होतो.

वरील संरक्षित भारतीय बासमती तांदळाच्या जातींची पाकिस्तानात होणारी विक्री आणि उत्पादन खरंतर बौद्धिक संपदा अधिकाराचे (IPR) उघड उल्लंघन आहे. भारत याविषयी संबंधित द्विपक्षीय मंचांवर आणि जागतिक व्यापार संघटनेत आवाज उठवू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan stole indias basmati rice how alarming is the situation really svs
First published on: 24-03-2024 at 16:06 IST