भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होण्याच्या पूर्वसंध्येला देशाने पद्म पुरस्कारविजेत्यांची घोषणा केली. एकूण १३२ जणांना या पुरस्काराने सन्मानित केले. त्यात पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण व ११० पद्मश्री पुरस्कार, अशा तीन श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची यादी जाहीर झाली. पुरस्कार विजेत्यांच्या या लांबलचक यादी भारतातील पहिल्या महिला हत्ती माहूत म्हणून प्रसिद्धी मिळविणाऱ्या आणि ‘हस्ती कन्या’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पार्वती बरुआचेही नाव या यादीत होते.

रूढींवर मात करून पशुसंवर्धन आणि पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण करण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून पार्वती बरुआ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पार्वती बरुआ यांचे जीवन

सदुसष्ट वर्षांच्या पार्वती बरुआ यांना ‘हस्ती कन्या’ म्हणूनही ओळखले जाते. त्या आसाममधील गौरीपूरच्या रहिवासी आहेत. हत्तींशी त्यांचे शतकानुशतके जुने नाते आहे. आसामी जमीनदार कुटुंबात जन्मलेल्या पार्वती बरुआ यांनी अगदी लहान वयातच हत्तींबरोबर खेळायला आणि बागडायला सुरुवात केली. त्यांचे वडील प्रकृतेश बरुआही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हत्ती तज्ज्ञ आहेत.

सरकारने हत्तीविक्रीवर बंदी घालण्यापूर्वी त्यांचे कुटुंब हत्ती पकडून विकायचे. असे म्हटले जाते की, त्यांच्या कुटुंबातील काही ग्राहकांमध्ये भूतान, कूचबिहार व जयपूरच्या राजघराण्यांचाही समावेश होता.

वयाच्या १४ व्या वर्षी बरुआ यांना कोक्राझार जिल्ह्यातील काचुगाव जंगलात त्यांचा पहिला हत्ती पकडण्यात यश मिळाले. त्यांनी हे काम कसे पूर्ण केले, असा प्रश्न केला असता, त्यांनी सांगितले, “हत्ती पकडणे ही क्रूर किंवा ताकदीची बाब नाही. हे सर्व मनात आहे आणि काही प्रमाणात याला नशीबही लागते.”

या घटनेनेच त्यांची माहूत बनण्याची इच्छा जागृत झाली. ही इच्छा त्यांनी सुरुवातीपासून चालत आलेल्या रूढी झुगारून १९७२ मध्ये पूर्ण केली. तेव्हापासून त्यांनी हत्तीसंवर्धनाची अनेक कामे केली.

वर्षानुवर्षे करीत असलेल्या कामांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यामुळेच बीबीसीने त्यांच्यावर ‘क्वीन ऑफ एलिफंट’ नावाची डॉक्युमेंटरीही तयार केली आहे.

एकदा त्यांना हत्तींबद्दल असलेल्या त्यांच्या आकर्षणाविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले होते, “प्रेमाचे वर्णन केले जाऊ शकत नाही. कदाचित हत्ती अतिशय स्थिर, निष्ठावान, प्रेमळ व शिस्तप्रिय असतात हे याचे कारण असू शकते.”

पार्वती बरुआ पद्मश्री पुरस्कारासाठी का योग्य?

हत्ती माहूत म्हणून त्यांना अनेक वर्षांत अनेक अनुभव आले. हत्तींना नियंत्रणात आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी स्वतःला वचनबद्ध केले असून, तीन राज्य सरकारांना जंगली हत्ती शोधणे आणि पकडणे यांसाठी त्यांनी मदत केली आहे.

अशाच घटनांमधील एक घटना पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात घडली. पश्चिम बंगाल जिल्ह्यात ५० हून अधिक हत्ती असलेला कळप आपला मार्ग चुकला होता. राज्यातील अधिकारी त्यांना पकडू शकले नाहीत. त्यावेळी त्यांनी पार्वती बरुआ यांना बोलावून घेतले.

पार्वती बरुआ यांच्याजवळील चार हत्ती, इतर माहूत आणि चारा संग्राहकांचा समावेश असलेल्या टीमसह त्या हत्तीच्या कळपाला त्यांच्या मार्गावर परत आणण्यात यशस्वी झाल्या. तब्बल १५ दिवसांच्या प्रयत्नांनंतर हत्ती त्यांच्या स्थलांतरीत मार्गावर परत आले.

मार्च २००३ मध्ये कदाचित त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत कठीण क्षण आला, जेव्हा त्यांना छत्तीसगडमध्ये एका भडकलेल्या हत्तीला ठार मारावे लागले.

त्यांनी म्हटले आहे, “माझे काम माणसाला हत्तींपासून वाचवणे आणि हत्तींना माणसापासून वाचवणे हे आहे. हत्तीला फक्त शांतता आणि सुरक्षितता हवी असते.”

आज बरुआ जलपाईगुडीमध्ये राहतात आणि त्यांचे जीवन आधुनिक सोई-सुविधांपासून वंचित आहे. एक गादी असलेल्या तंबूत त्या राहतात. या तंबूच्या अवतीभवती दोऱ्या, साखळ्या व खुकरी ही त्यांच्या व्यापाराशी संबंधित असणारी साधने आहेत.

हेही वाचा : कट्टरपंथी मैतेई गटाने आमदारांना बोलावण्यासाठी इंफाळचा कंगला किल्लाच का निवडला? जाणून घ्या कंगला किल्ल्याचे खास महत्त्व..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बरुआ यांना ओळखणारे लोक सांगतात की, आताही जेव्हा जंगली हत्ती चहाच्या बागेत भटकतात किंवा भडकलेले असतात, तेव्हा कुणाचे प्राण जाण्यापूर्वी या हत्तींना जंगलात परत नेण्यासाठी पार्वती बरुआ यांना बोलावले जाते.