दिल्लीमध्ये स्वित्झर्लंडची नागरिक असलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचे नाव नीना बर्जर (३०) असून तिचा मृतदेह पश्चिम दिल्लीमधील एमसीडी शाळेच्या परिसरात आढळला होता. मृतदेह आढळला तेव्हा या महिलेचे हात आणि पाय बांधलेले होते. तसेच तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या. या प्रकरणात जनकपुरी येथील उद्योजक गुरुप्रित याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मृत महिला परदेशी असल्यामुळे या घटनेचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांना अनेक अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांपुढे नेमक्या काय अडचणी आहेत? कोणत्याही परदेशी व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस तपास कसा करतात? त्यासाठी काय नियम असतात? हे जाणून घेऊ या…

दिल्लीत येण्यास कुटुंबीयांनी दाखवली असमर्थता

स्वित्झर्लंडची महिला नीना बर्जर यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. दिल्लीमध्ये येण्यास तसेच तपासात सहकार्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे नीना यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी गुरुप्रित हा एकमेव व्यक्ती आहे, ज्याने या प्रकरणात बर्जर यांचा मृतदेह ओळखला आहे. फक्त आरोपीच मृतदेहाला ओळखू शकत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आव्हानात्मक तसेच किचकट झाला आहे.

कुटुंबीयांची शवविच्छेदनास परवानगी

दरम्यान, बर्जर यांच्या कुटुंबीयांनी दिल्लीमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली असली तरी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास परवानगी दिलेली आहे. गेल्या आठवडाभरापासून शवविच्छेदनास परवानगी मिळण्याची दिल्ली पोलिस वाट पहात होते. कुटुंबीयांनी परवानगी दिल्यामुळे आता दिल्लीतील दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात बर्जर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.

नियम काय सांगतो?

एखाद्या परदेशी नागरिकाने आत्महत्या केली असेल, हत्या, अपघात झाला असेल तर अशा प्रकरणांत तपास करण्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. सर्वप्रथम मृत्यू झालेल्या व्यक्तीची पासपोर्टच्या मदतीने ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्न करतात. त्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यासाठी संबंधित देशाच्या दूतावासाशी संपर्क साधला जातो. दूतावासाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जातो. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी कुटुंबीयांना भारतात बोलावले जाते. मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचीही कुटुंबीयांकडून परवानगी घेतली जाते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाणपत्र, शवविच्छेदनाचा अहवाल, अंत्यसंस्कार केल्याचे प्रमाणपत्र, पोलिसांनी तपास केलेली कागदपत्रे अशा सर्व माहितीच्या आधारे संबंधित देशाच्या दूतावासाकडून मृत्यूसंदर्भात एक अहवाल तयार केला जातो.

मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिस काय करतात?

मृत व्यक्तीचे नातेवाईक जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह जपून ठेवला जातो. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिस काही आठवडे वाट पाहतात. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिस नोटीस जारी करतात. मात्र, शेवटपर्यंत मृतदेहाची ओळख पटू न शकल्यास तपास अधिकाऱ्याच्या समक्ष नियमानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते.

नीना बर्जर प्रकरणात काय अडचण आहे?

नीना बर्जर मृत्यू प्रकरणात सर्वात पहिली आणि मोठी अडचण म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांनी भारतात येण्यास दिलेला नकार. आम्ही सध्या दिल्लीमध्ये येऊ शकत नाही, तसेच तपासात सहकार्य करू शकत नाही, असे बर्जर यांच्या कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांना सांगितले आहे. परदेशी नागरिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर अशा प्रकरणात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीचा पुरावा म्हणून वापर केला जातो.” अशा प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळाच्या व्यक्तीकडून पुरावे मिळतात. मात्र, बर्जर यांना ओळखणारा गुरुप्रित हा एकमेव व्यक्ती आहे. गुरुप्रित या प्रकरणात आरोपी आहे. गुरुप्रित चौकशीदरम्यान प्रत्येकवेळी वेगवेगळे जबाब देत आहे”, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्ली पोलिसांपुढे आता काय पर्याय आहे?

सध्या मतृदेहाची निश्चित ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिस डीएनए चाचणी करू शकतात. त्यासाठी पोलिस नीना बर्जर यांचे रक्त, केस किंवा त्वचेचा नमुना घेऊ शकतात. हे नमुने स्वित्झर्लंडला पाठवून बर्जर यांच्या नातेवाईकांचा डीएनए बर्जर यांच्या डीएनएशी मिळतो का? हे तपासले जाऊ शकते. बर्जर यांच्या कुटुंबीयांनी दिल्लीत येण्यास नकार दिल्यामुळे दिल्ली पोलिस स्वित्झर्लंडला जाऊ शकतात.

…तर परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेतला जातो

ॲड. जितेंदर कुमार यांनी या प्रकरणात आरोपीची ओळख पटवण्यासाठी काय करता येऊ शकते, याबाबत सविस्तर माहिती दिली. “एखाद्या मृत व्यक्तीची ओळख पटत नसेल तर अशा वेळी परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेतला जातो. प्रवासाचे तिकीट, चॅटिंग, अन्य इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, प्रवासाची माहिती; अशी माहिती गोळा करूनही एखाद्या व्यक्तीची ओळख पटू शकते. अशा परिस्थितीत परदेशी नागरिकाचा पासपोर्टदेखील ओळख पटवण्यासाठी फार महत्त्वाचा दुवा ठरतो”, असे कुमार यांनी सांगितले. मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखणे हे फार महत्त्वाचे मानले जाते. मात्र, ते शक्य न झाल्यास अन्य पुरावेदेखील महत्त्वाचे ठरतात.

मृतदेहाची ओळख पटणे फार महत्त्वाचे

परदेशी नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी खटला सुरू झाल्यानंतर मृतदेहाची नेमकी ओळख फार महत्त्वाची बाब ठरते. मात्र, तसे न झाल्यास कोर्टात खटला टिकावा यासाठी अन्य ठोस पुरावा सादर करावा लागतो, असे दिल्लीतील पोलिस अधिकारी मॅक्सवेल परेरा यांनी सांगतले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी तपासकार्यात सहकार्य न केल्यास पोलिसांसाठी ही अडचणीची बाब ठरू शकते. कारण नातेवाईकांनी सहकार्य न केल्यास अशा प्रकारचा संपूर्ण खटला हा फक्त अन्य पुराव्यांच्या आधारेच लढावा लागतो. त्यामुळे परदेशी नागरिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मतृदेह ओळखणे गरजेचे असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…अन्यथा अस्थी सुपूर्द केल्या जातील”

दरम्यान, नीना यांच्या कुटुंबीयांनी तपासात सहकार्य केल्यास किंवा पार्थिव त्यांच्या देशात घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून मृतदेह त्यांच्याकडे सोपवला जाईल. अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार करून मृतदेहाच्या अस्थी नातेवाईकांना सुपूर्द केल्या जातील, असे दिल्ली पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.