Western Disturbances Impact Summer : दरवर्षी मेच्या उत्तरार्धात काही दिवस पडणारा वळवाचा पाऊस अलीकडे अजिबात पडत नाही, अशी निरीक्षणे गेल्या वर्षीपर्यंत ताजी होती. मात्र, यंदा तो इतका पडतो आहे की, त्या पावसाच्या पाण्यात ही निरीक्षणे पार धुऊन गेली आहेत. तसं पाहता, यंदाचा उन्हाळाही आतापर्यंत असामान्य राहिला आहे. सामान्यतः ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमान गाठणाऱ्या दिवसांऐवजी या वर्षीचे आतापर्यंत तापमान तुलनेनं कमी राहिलं आहे, ज्यामुळे उष्णतेच्या लाटेचं प्रमाणही कमी झालं आहे. मे महिन्याच्या अखेरीस देशाच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारपिटीचा तडाखाही बसला आहे. दरम्यान, हवामानात हे बदल कशामुळे झाले? त्यामागची नेमकी कारणं काय? हे जाणून घेऊ…

यंदाचा उन्हाळा असामान्य कशामुळे?

यंदाचा मे महिना अनेक भौगोलिक घटनांमुळे वेगळा ठरला. एरवी मे महिना म्हटला की, तापमानात वाढ, घामांच्या धारा व चढलेला पारा, अशी स्थिती असते. त्यामुळे पाण्याची आणि पर्यायाने विजेची मागणी वाढलेली असते. रस्त्यांवर दुपारच्या वेळी प्रवास करणेही अवघड होऊन बसते. मात्र, यंदाचा मे महिना तसा ठरला नाही. सुरुवातीला पश्चिम विक्षोभामुळे राज्यात आणि विशेषतः कोकण भागात पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मोसमी पावसाचे अंदनामान आगमन लवकर झाले. त्यामुळे ज्या पूर्वमोसमी किंवा वळवाच्या पावसाच्या सरी मे महिन्याच्या अखेरीस बरसतात. त्या सरी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोसळल्या.

रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद नाही

भारतीय हवामान विभागानुसार, या वर्षी मार्चच्या सुरुवातीपासून ते १८ मेपर्यंत देशाच्या कोणत्याही भागात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झालेली नाही. मार्चमध्ये मध्य भारतातील तापमान सरासरीपेक्षा थोडे जास्त होते; पण देशाच्या इतर भागांमध्ये सामान्य तापमान होते. एप्रिलमध्ये महाराष्ट्र, ओडिशा आणि जम्मू व काश्मीरच्या काही भागांत एक-दोन दिवस उष्णतेच्या लाटा जाणवल्या. गुजरात व राजस्थानमध्ये या लाटांचे प्रमाण अधिक होते. तरीदेखील देशातील मुख्यत: उष्णताप्रवण क्षेत्र (Core Heatwave Zone – CHZ) असलेल्या भागात या उष्णतेच्या लाटा कमी जाणवल्या.

आणखी वाचा : Pakistan Terrorists : कोण आहे आमिर हमजा? त्याच्यावर हल्ला कुणी केला? भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?

दरवर्षीपेक्षा यंदाचे हवामान तुलनेने थंड असल्यामुळे संपूर्ण भारताचे सरासरी तापमान सामान्य राहण्यास मदत झाली आहे. मान्सूनपूर्व हंगामात दक्षिण भारतात पावसाने अधूनधून हजेरी लावली, ज्यामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी उकाडा जाणवला. एप्रिलमध्ये मध्य भारतातही पावसाचे हेच स्वरूप दिसून आलं आहे.

हवामानात बदल नेमका कशामुळे झाला?

दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा सामान्य राहण्याचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम विक्षोभ (Western Disturbances) पश्चिम विक्षोभामुळे भूमध्य समुद्रातून पाश्चिमात्य वारे येतात. त्यामुळे तापमानात घट होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होते. मार्च व एप्रिलमध्ये असे चार प्रसंग घडले; तर मेमध्ये आतापर्यंत दोन वेळा पश्चिम विक्षोभाचा प्रभाव जाणवला आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांनी भारतात प्रवेश केल्यामुळे अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. वादळामुळे कमाल व किमान तापमानात साधारणपण: ५-७ अंश सेल्सिअसने घट होते, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

मेमध्ये पाऊस कशामुळे पडतोय?

दरवर्षी मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असते. उत्तर, वायव्य व मध्य भारतात उष्णतेच्या लाटांचं प्रमाण अधिक असतं; परंतु, या वर्षी १ मे सोडल्यास कुठेही उष्णतेची लाट नोंदवली गेलेली नाही. १ मे रोजी केवळ दक्षिण-पश्चिम राजस्थानमध्ये काही प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. या महिन्यात विशेषतः दक्षिण व मध्य भारतात जोरदार पाऊस झाला आहे. २ ते ७ मेदरम्यान सलग आलेल्या पश्चिम विक्षोभांमुळे राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र-कच्छ, गुजरात, हरियाणा, दिल्ली, गंगीय पश्चिम बंगाल, उत्तराखंड, केरळ, माहे, तमिळनाडू व पुडुचेरीमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे.

अवकाळीमुळे तापमानात होतेय घट

मागील तीन आठवड्यांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याने उत्तर-पश्चिम भारतातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २ ते ८ मेदरम्यान देशभरात २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे पश्चिम, मध्य व पूर्व भारतातील कमाल तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्याशिवाय पूर्व व मध्य भारतातील किमान तापमानही १ ते ३ अंशांनी कमी झाले आहे.

हेही वाचा : Operation Sindoor : शशी थरूर यांच्या निवडीवरून वाद कशासाठी? काँग्रेसच्या आक्षेपाचे कारण काय?

या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

८ ते १४ मे या आठवड्यातही पावसाची अशीच काहीशी परिस्थिती होती. पश्चिमी विक्षोभामुळे त्रिपुरा, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, सौराष्ट्र, कच्छ, कोकण, गोवा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, माहे, रायलसीमा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व ओडिशामध्ये जोरदार पाऊस झाला. परिणामी या भागांतील कमाल व किमान तापमानात सातत्यानं घट झाली. त्यानंतर मॉन्सूनपूर्व पावसानं अंदमान व निकोबार बेटे, अंदमान समुद्र व बंगालच्या उपसागरातील काही भागांपर्यंत प्रवेश केला. या आठवड्यात देशभरात सरासरी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. गेल्या आठवड्यात पश्चिम, मध्य व उत्तर भारतात आठवड्याचं सरासरी कमाल तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसनं कमी होतं; परंतु या काळात देशाच्या उर्वरित भागांत सामान्य तापमानाची नोंद झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॉन्सून लांबणीवर पडणार का?

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात सरासरी कमी तापमानाची नोंद झाली असली तरी मे महिन्याच्या अखेरीस उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राजस्थान आणि हरियाणामध्ये २३ मेपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर व उत्तर-पश्चिम भारतातील उन्हाळा जूनच्या उत्तरार्धापर्यंत चालतो. जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला नैर्ऋत्य मॉन्सूनच्या आगमनाने त्याचा शेवट होतो. यंदा दक्षिण-पश्चिम मॉन्सून २७ मेपर्यंत केरळच्या किनाऱ्यावर पोहोचणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाची सुरुवात लवकर झाली असली तरी हवामानाची योग्य परिस्थिती असल्यास या वर्षी मॉन्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे.