मुंबई महानगर पट्ट्यातील महत्त्वाच्या अशा विकास प्रकल्पांच्या लोकार्पणावरून या भागातील राजकारण सध्या तापले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ४८ जागा असलेले महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य मानले जाते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपने शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मोठे खिंडार पाडले. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वेळा महाराष्ट्राचे दौरे केले आहेत. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे या भागातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्तेच केले जावे असा मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न आहे. यासाठी ॲाक्टोबर महिन्याच्या अखेरीस पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबई आणि वसई-विरार पट्ट्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा भव्य सोहळा आयोजित करण्याची तयारीही राज्य सरकारने केली होती. मात्र पंतप्रधानांचा दौरा ऐन वेळेस पुढे ढकलण्यात आला आणि या प्रकल्पांचे लोकार्पणही कागदावर राहिले.

पंतप्रधानांच्या प्रतीक्षेतील प्रकल्प कोणते?

केंद्र सरकारचे अनुकरण करत राज्य सरकारनेही महिला वर्गाचे लक्ष वळविण्यासाठी ‘नारी शक्ती सन्मान’ योजनेची आखणी केली असून या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचे जवळपास निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात तीन ते चार वेगवेगळ्या तारखांची निश्चिती करण्यात आली होती. नवी मुंबईत सिडकोने उभारलेला बहुचर्चित मेट्रो प्रकल्प, नेरुळ-उरण रेल्वेचा पुढील टप्पा, दिघा रेल्वे स्थानक शिवाय वसई-विरार आणि मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते निश्चित करण्यात आले होते. ३० ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाच्या प्रशस्त अशा मैदानावर या कार्यक्रमाच्या आयोजनाची आखणीही पूर्ण करण्यात आली होती. आयोजनाची जबाबदारी मुख्यत्वे करून सिडकोने उचलावी असे ठरविण्यात आले होते. तब्बल सहा लाख चौरस फूट आकाराचा जर्मन हँगर पद्धतीचा शामियाना उभारून एक लाख महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र ऐन वेळेस पंतप्रधानांनी कार्यक्रम पुढे ढकलल्याने आयोजकांचे बेत फसले.

mohan bhagwat
“मतदान हा केवळ आपला अधिकार नसून…”, RSS प्रमुख मोहन भागवतांनी नागपुरात बजावला हक्क
election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
halicopter
महायुती विरुद्ध आघाडी लढत; पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती

हेही वाचा : विश्लेषण: ‘फिनफ्लुएन्सर’वर सेबीचा दंडुका?

आगामी निवडणुकीसाठी प्रकल्प महत्त्वाचे?

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी १० लोकसभा मतदारसंघ हे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत येतात. याशिवाय मुंबई महानगर पट्ट्याशी संलग्न असलेले उरण, पनवेल आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघही मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतात. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या सर्व मतदारसंघांत महायुतीचा मोठा विजय झाला होता. विधानसभा निवडणुकीत राज्यातील इतर भागांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळत असताना मुंबई महानगर प्रदेशात भाजप-शिवसेना युतीची घोडदौड कायम राहिली. हे लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीतही या पट्ट्याकडे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याने आगामी निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय ठाणे, पालघर पट्ट्यातील जागांवर होणाऱ्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.

हेही वाचा : अजित जोगी ते भूपेश बघेल, जाणून घ्या छत्तीसगड राज्याचा राजकीय इतिहास!

लांबणीवर पडलेले लोकार्पण विरोधकांच्या पथ्यावर?

पंतप्रधानांच्या हस्ते या पट्ट्यातील प्रकल्पांचे लोकार्पण करून विकासाच्या दिशेने राज्य कसे अग्रेसर ठरत आहे असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. पेंधर ते बेलापूर मार्गावर सिडकोमार्फत राबविण्यात आलेला मेट्रो प्रकल्प हा मुंबईबाहेरील कार्यान्वित झालेला मुंबई महानगर प्रदेशातील पहिला मेट्रो प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे तळोजा, खारघर या भागांतील रहिवाशांना अंतर्गत वाहतुकीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे शिवाय खारघरपुढील तळोजा आणि आसपासच्या भागांतील बांधकाम क्षेत्राच्या वाढीसदेखील यामुळे फायदा होणार आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर भागांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यामुळे सूर्या धरण प्रकल्पातून मिळणारे पाणी त्यांच्यासाठी आवश्यक आहे. दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊनही येथे ट्रान्सहार्बर लोकल थांबत नसल्यामुळे दिघा, विटावा भागांतील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. पंतप्रधानाच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा लांबल्याने उद्धव ठाकरे गट तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्द्यावरून जोरदार आंदोलने सुरू केली असून विरोधकांच्या हाती आयता मुद्दा सापडला आहे.

हेही वाचा : रश्मिका मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ व्हायरल; पण डीपफेक तंत्रज्ञान आहे तरी काय?

दिघा स्थानकाच्या लोकार्पणाचा तिढा कोणामुळे?

ठाणे-वाशी-नेरुळ-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्थानकाच्या कामास २०१८ मध्ये प्रत्यक्षात सुरुवात झाली. दोन टप्प्यांमध्ये या प्रकल्पाचे काम सुरू आहे. यातील पहिला टप्पा ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांमध्ये दिघा स्थानक तयार करणे आणि दुसऱ्या टप्प्यात ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका तयार केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्याचे म्हणजेच दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्थानकावर दिघा गाव अशी पाटीही झळकली आहे. या स्थानकाचे काम पूर्ण होऊन पाच ते सहा महिने झाले असले तरी स्थानकाचे लोकार्पण होत नसल्यामुळे मध्यंतरी स्थानिक खासदार राजन विचारे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. हे स्थानक सुरू झाल्यास विटावा, दिघा, कळव्यातील नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. मात्र आपल्याला याचे श्रेय मिळू नये यासाठी हे लोकार्पण सतत पुढे ढकलले जात असल्याचा आरोप खासदार विचारे यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या ऑक्टोबर महिन्यातील नियोजित कार्यक्रमातही या स्थानकाच्या लोकार्पणाची चर्चा कुठेच नव्हती. त्यामुळे दिघा स्थानकाचे लोकार्पण नेमके कधी होणार याविषयी एकूणच संभ्रमाचे वातावरण आहे.