Ahmedabad Plane Crash गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. गुरुवारी दुपारी २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अपघात झाल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला असून फ्लाईट AI171 चा अपघात झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल आणि अशा आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विमान अपघात झाल्यास नक्की कोण भरपाई देतं, असा प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे. प्रवास विमा आणि अपघात झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाईविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

अपघात झाल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला असून फ्लाईट AI171 चा अपघात झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

विमान कंपनीची जबाबदारी काय?

देशांतर्गत विमानांसाठी विमान वाहतूक मंत्रालय नियम ठरवते. २०१४ मध्ये हवाई वाहतूक मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, विमान अपघात झाल्यास विमान कंपन्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असतात. मात्र, आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे वेगळे नियम आहेत. त्यात भरपाई देण्याची तरतूद वेगळी आहे. आंतरराष्ट्रीय विमान अपघात झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबाला विमान कंपनीकडून १ लाख १३ हजार १०० एसडीआर दिले जातात, म्हणजेच १.४ कोटी दिले जातात. एक एसडीआर म्हणजे अमेरिकेच्या १.४१ डॉलर्सबरोबर आहे. एसडीआर म्हणजे आंतरराष्ट्रीय राखीव निधी. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) सदस्य देशांच्या कर्जासाठी १९६९ मध्ये या निधीची सुरुवात केली. सदस्य देश एकमेकांच्या चलनातील कर्ज (कठीण आर्थिक परिस्थितीत) एसडीआरच्या बदल्यात नाणेनिधीकडून घेऊ शकतात. अशा पद्धतीची ही आंतरराष्ट्रीय कर्जव्यवहार योजना आहे.

प्रवास विम्यामुळे प्रवासी आणि कुटुंबांना कशी मदत होते?

प्रवास विम्यामुळे अतिरिक्त आर्थिक मदत मिळू शकते, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत, जसे की :

  • अपघाती मृत्यू आणि अपंगत्व
  • वैद्यकीय स्थलांतर
  • आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल केल्यास
  • विमान विलंब/रद्द झाल्यास
  • सामान हरविल्यास

प्रवासी विम्यात किती भरपाई मिळते?

  • अपघाती मृत्यू झाल्यास २५ लाख ते १ कोटी रुपये मिळतात
  • कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ ते १० लाख रुपये मिळतात
  • रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास किंवा प्रवासात गैरसोय झाल्यास निश्चित भरपाई मिळते.

परंतु, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा फायदा केवळ अशा विमाधारकांनाच मिळतो, जे उड्डाण करण्यापूर्वी प्रवास विमा योजना खरेदी करतात. बरेच भारतीय प्रवासी अजूनही या पर्यायाकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः देशांतर्गत उड्डाणांसाठी. जर विमान कंपनीचा दुर्घटनेत निष्काळजीपणा सिद्ध झाला, तर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त भरपाईदेखील शक्य आहे.

जर एखाद्या प्रवाशाने प्रवास विमा खरेदी केला नसेल तर काय?

जर तुम्ही प्रवास विमा खरेदी केला नसेल, तर तुम्ही पुढील गोष्टींसाठी पात्र असू शकता:

  • विमान कंपन्यांकडून मिळणारी भरपाई (अनिवार्यतेनुसार)
  • सरकारकडून स्वेच्छेने दिली जाणारी देणगी म्हणजेच एक्स-ग्रेशिया (क्वचित प्रसंगी)
  • नियोक्ता विमा (व्यावसायिक प्रवाशांसाठी)
  • क्रेडिट कार्ड-लिंक्ड प्रवास विमा (तिकीट प्रीमियम क्रेडिट कार्डद्वारे बुक केले असेल तर)

मागील अनेक घटनांमध्ये अपघातग्रस्त कुटुंबांना भरपाईसाठी महिने किंवा अगदी वर्षे वाट पहावी लागली आहे. काही प्रकरणात अजूनही अपघाताची चौकशी सुरू आहे, काही प्रकरणांमध्ये जबाबदारीबाबत वाद आहे, तर काही अशीही प्रकरणे आहेत, ज्यात प्रवाशाकडे कोणताही प्रवास विमा किंवा नामांकित व्यक्तीची माहिती नव्हती. अशा प्रकरणांमध्ये, कुटुंबांना ग्राहक न्यायालये, दिवाणी न्यायालये किंवा विमा लोकपालसारख्या तक्रार निवारण संस्थांकडे जावे लागू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक प्रवाशाने ‘या’ गोष्टी आवर्जून कराव्यात

  • प्रवास विमा खरेदी करा, हे देशांतर्गत उड्डाणांनाही लागू होते.
  • नामांकित व्यक्तीची माहिती स्पष्टपणे नमूद करा.
  • अपघाती मृत्यू आणि वैद्यकीय कव्हर असलेल्या विम्याची निवड करा.
  • विमा कागदपत्रांच्या डिजिटल आणि छापील प्रती जपून ठेवा.

एअर इंडियाचे अपघातावर स्पष्टीकरण

एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, “अत्यंत दुःखाने मी याची पुष्टी करतो की, अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक येथे जाणारे एअर इंडियाचे विमान ‘एआय १७१’चा आज अपघात झाला. या अपघातात बाधित झालेले सर्वांचे कुटुंबीय आणि प्रियजनांबरोबर आमच्या तीव्र संवेदना आहेत. सध्या आमचे प्राथमिक लक्ष सर्व बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक ती सर्व काळजी प्रदान करण्यासाठी काम करत आहोत. “कुटुंबांसाठी एक आपत्कालीन केंद्र सक्रिय करण्यात आले आहे आणि मदत पथक स्थापन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.