भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध दिवसेंदिवस वाढत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कॅनडाकडे मागितलेले खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र अद्याप त्यांच्याकडे सुपूर्द केले गेलेले नाही. गेल्या जूनमध्ये ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील गुरुद्वाराबाहेर दोन हल्लेखोरांनी निज्जर याची गोळ्या झाडून हत्या केली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येत भारतीय अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप भारतावर केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला. कॅनडावर अतिरेकी आणि भारतविरोधी घटकांना आश्रय दिल्याचा आरोप भारताने केला. त्याबरोबर भारताने केले गेलेले सर्व आरोप नाकारले. हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यू प्रमाणपत्राचा वाद काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

हरदीप सिंग निज्जर कोण होता?

पंजाबच्या जालंधरमध्ये जन्मलेला निज्जर १९९७ मध्ये कॅनडामध्ये स्थायिक झाला. त्याने सुरुवातीला तिथे प्लंबर म्हणून काम केले आणि त्यानंतर लग्न केले. त्याला दोन मुले आहेत. निज्जर ब्रिटिश कोलंबियामध्ये राहून खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करीत होता. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार- निज्जर केटीएफ या संघटनेचे संचालन आणि नेटवर्किंग सांभाळत होता. तसेच संघटनेच्या सदस्यांना प्रशिक्षण देणे आणि वित्तपुरवठा करण्यातही त्याचा सक्रियपणे सहभाग होता. २०२० मध्ये गृह मंत्रालयाने (एमएचए) त्याला दहशतवादी घोषित केले. निज्जर हा गुरपतवंत सिंग पन्नून याच्या खलिस्तानसमर्थक गट शीख फॉर जस्टिस (SFJ)शी संबंधित होता; ज्या गटावर भारतात बंदी आहे. मागील फेब्रुवारीमध्ये गृह मंत्रालयाने खलिस्तान टायगर फोर्सला बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Unlawful Activities Prevention Act – UAPA) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. १८ जून २०२३ रोजी सरेच्या गुरू नानक शीख गुरुद्वाराच्या बाहेर गोळ्या घालून निज्जरची हत्या करण्यात आली होती. २०२० पासून तो सरे शहरातील गुरुद्वाराचा प्रमुख होता.

एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कॅनडाने अद्याप निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र सुपूर्द केलेले नाही. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : प्राण्यांची गणना का केली जाते? त्यामागचे उद्दिष्ट काय?

हरदीपसिंग निज्जरवर एनआयएचे आरोप

निज्जरचा २०२१ मध्ये जालंधरमध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर झालेल्या हल्ल्याशी संबंध होता. एनआयएने २०२२ मध्ये त्याच्यावर १० लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. निज्जरने प्रक्षोभक टिप्पणी केल्याचे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचे तपासकर्त्यांना आढळून आले होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार एनआयएने म्हटले आहे की, तो देशद्रोह व बंडखोरीची भावना भडकवत असल्याचे आणि भारतातील विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताच्या दहशतवादविरोधी यंत्रणेने डिसेंबर २०२० मध्ये निज्जर, पन्नून व परमजित सिंग पम्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. शेतकऱ्यांनी केंद्राच्या तीन शेती कायद्यांविरोधात केलेल्या निषेधादरम्यान, भय व अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप करून, लोकांमध्ये असंतोष निर्माण केल्याचा व लोकांना भारत सरकारविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप त्यांच्यावर होता.

कॅनडाने निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार का दिला?

एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कॅनडाने अद्याप निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र सुपूर्द केलेले नाही. “मृत्यू प्रमाणपत्र सुपूर्द करण्याऐवजी त्यांनी आम्हाला ‘तुम्हाला त्याची गरज का आहे,’ असे विचारले,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, ‘एनआयए’ने रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP)कडून निज्जरविरुद्ध प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयीन नोंदी अद्ययावत करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र मागितले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागितले गेले होते आणि कॅनडाने काही महिन्यांपूर्वी आम्हाला त्याचे कारण विचारले होते.

हेही वाचा : ‘या’ देशाने सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाडीत बसवल्या चाकू प्रतिरोधक छत्र्या; कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एनआयएकडे दोन प्रकरणे दाखल आहेत; ज्यात निज्जरचे नाव आरोपी म्हणून होते. त्यांच्या केस फाइल्सच्या कागदपत्रांचे काम पूर्ण करण्यासाठी, तपास अधिकाऱ्याला निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र दिल्ली न्यायालयासमोर दाखवावे लागेल. म्हणूनच त्यांनी म्युच्युअल लीगल असिस्टन्स ट्रीटी (एमएलएटी)अंतर्गत कॅनडाच्या सरकारकडे निज्जरच्या मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली आहे. मृत्यू प्रमाणपत्र देण्याऐवजी त्यांनी उलट प्रश्न केले आहेत आणि आता त्यांना त्यांनी केलेल्या प्रश्नांवरील उत्तरे पाठविली जातील,” असे यंत्रणेच्या अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.