– ज्ञानेश भुरे

विश्वचषक हॉकी स्पर्धेत १९७५मध्ये भारताने सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर आजपर्यंत ४८ वर्षे भारताची पाटी कोरीच राहिली आहे. ऑलिम्पिक कांस्यदकानंतर आशा उंचावल्या होत्या. पण, विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीने त्या सगळ्यावर पाणी फेरले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत विजयमंचावर येण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. उपांत्यपूर्व फेरीपर्यंतही यजमान भारताला मजल मारता आली नाही. स्पर्धेत भारताच्या अपयशामागील कारणांवर एक दृष्टिक्षेप.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेत कितपत संधी होती?

भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत खूप मोठी वगैरे संधी होती असे मानता येणार नाही. पण, ऑलिम्पिक कांस्यपदक आणि नंतरच्या काही स्पर्धा बघितल्या तर चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा निश्चित उंचावल्या होत्या. मात्र, या अपेक्षेपर्यंतही भारतीय हॉकी संघ पोहोचू शकला नाही. किमान पातळीपर्यंत भारतीय खेळाडू आपला खेळ या स्पर्धेत तेही घरच्या मैदानावर, प्रेक्षकांसमोर दाखवू शकले नाहीत.

भारताच्या पराभवाचे नेमके कारण काय?

संघ रचनेपासून, संघ नियोजन, वैयक्तिक कामगिरी, सांघिक भावना अशी अनेक कारणे या पराभवासाठी देता येतील. संघ रचनेबाबत बोलताना अचानक कर्णधारपदात केलेला बदल अनाकलनीय होता. मनप्रीतसिंग ऑलिम्पिकपासून चांगले नेतृत्व करत होता. प्रत्येक खेळाडूला जबाबदारीचे महत्त्व कळायला हवे म्हणून ऑलिम्पिकनंतर विविध स्पर्धांत कर्णधार बदलण्यात आले. हे कारण न समजणारे आहे. मनप्रीतला खेळाडूंची ओळख झाली होती, त्याचा संपर्क चांगला होता. विशेष म्हणजे तो कर्णधारपदाचे दडपण पेलू शकत होता. त्याला संघाची नाळ चांगली समजली होती. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी असाच कर्णधार अपेक्षित होता. हरमनप्रीत कर्णधारपदाचे दडपण पेलू शकला नाही. हेच मैदानावरील नियोजनाच्या बाबतीत घडले आणि याचा परिणाम सांघिक कामगिरीवर झाला. सर्वांत मोठे कारण म्हणजे पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेले अपयश.

पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेले अपयश किती मारक ठरले?

विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवासाठी अनेक कारणे देता येतील. पण, तो कारणमीमांसेचा एक भाग असेल. पेनल्टी कॉर्नरवर आलेले अपयशच भारताच्या पराभवासाठी मारक ठरले यात शंकाच नाही. पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारतीय संघाने चांगली तयारी दाखवली होती. ऑलिम्पिक आणि त्यानंतरच्या काही सामन्यात भारताने ते दाखवून दिले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ३१ पेनल्टी कॉर्नर मिळविले. त्यापैकी १० कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्यात भारत यशस्वी ठरला होता. तुलनेत विश्वचषक स्पर्धेत चार सामन्यांत भारताने २६ पेनल्टी कॉर्नर मिळविले. पण, केवळ ४ गोलांत परिवर्तित होऊ शकले. विशेष म्हणजे या चारपैकी केवळ वरुणकुमारच थेट गोल करू शकला. दोन गोल रिबाउंडवर झाले आणि हरमनप्रीतने केलेल्या गोलमध्ये वेल्सने गोलरक्षकाला विश्रांती दिली होती. पेनल्टी कॉर्नवर आलेले अपयश हे भारताच्या अपयशाचे सर्वांत मोठे कारण आहे.

पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात इतके मोठे अपयश का आले?

सध्या तरी हॉकी विश्वात पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यासाठी हरमनप्रीतचा कुणी हात धरू शकत नाही असे मानले जात होते. पण, एकट्या हरमनप्रीतवर अवलंबून राहणे भारताला महाग पडले. हरमनप्रीत कर्णधारपदाच्या दडपणाखाली आपली कामगिरी उंचावू शकला नाही. त्याने कॉर्नरवर एकच गोल केला, तोदेखील गोलरक्षक नसताना. पेनल्टी कॉर्नरसाठी आपण पर्यांयाचा विचारच केला नाही. हा नाही, तर दुसरा याकडे आपण दुर्लक्ष केले. जुगराजच्या पर्यायाचा आपण विचारच केला नाही. या सगळ्यात रुपिंदरपाल सिंगची उणीव जाणवली. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या यशात त्याच्या कॉर्नरवरील कौशल्याचा मोठा वाटा होता. मात्र, त्याने ऑलिम्पिकनंतर अचानक तडकाफडकी निवृत्ती घेतली.

अनुभवी खेळाडूंवर दाखवलेला अविश्वास हे अपयशाचे आणखी एक कारण?

साखळी सामन्यात आपण फार काही चांगला खेळ केला असे म्हणता येणार नाही. ज्या सामन्यात मोठा विजयाची अपेक्षा होती, त्या वेल्सविरुद्धच्या सामन्यातही आपण काही करू शकलो नाही. येथेच आपल्यासाठी अर्धी लढाई संपली होती. पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात अपयश येत असताना, मैदानी खेळातही आपण फार काही विलक्षण कामगिरी दाखवू शकलो नाही. वेल्सविरुद्धच्या सामन्यात तर भारतीय खेळाडू गोलांचा शोध घेताना दिसत होते. त्यांचे हवेतील फटके थेट मैदानाबाहेर जात होते. न्यूझीलंडविरुद्ध पेनल्टी शूट आउट असतानाही संघ व्यवस्थापनाने मनदीप, आकाशदीप, मनप्रीत सिंग, ललित उपाध्याय या अनुभवी खेळाडूंना स्ट्राइक घेण्यापासून दूर का ठेवले.

गोल करण्याच्या अनेक संधी भारताने दवडल्या का?

भारताने विजय आवश्यक असलेल्या सामन्यात गोल करण्याच्या एकामागून एक संधी दवडल्या. भारतीय खेळाडूंच्या खेळात योग्य समन्वय नव्हता. त्यांच्या फटक्यात अचूकता नव्हती. भारतीय खेळाडूंचे पासही योग्य नव्हते. चेंडूवर ताबा राखण्यातही भारतीय खेळाडू अपयशी ठरले. शूट आउट आणि सडन डेथ मध्येही गोलरक्षक श्रीजेशने भारताचे आव्हान राखले होते. क्रिशन बहादूर पाठकनेही चांगले गोलरक्षण केले. पण त्यांच्यावर फार विसंबून राहणे योग्य नव्हते.

हेही वाचा : विश्लेषण: हॉकीत पेनल्टी कॉर्नरच्या नियमात नव्याने बदल करण्यामागचे कारण काय?

अपेक्षांचे ओझे आणि मानसिक दडपण हाताळण्यात अपयशी ठरलो का?

ऑलिम्पिक यशापासून भारतीय संघाकडून अपेक्षा उंचावल्या होता. या अपेक्षाच्या ओझ्याखाली भारतीय खेळाडू दबले गेले. मानसिक तंदुरुस्तीच्या आघाडीवरही भारतीय खेळाडू मागे राहिले. आजपर्यंत भारतीय खेळाडू शारीरिक तंदुरुस्तीत मागे पडत होते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटले होते. त्याविषयीची जागरूकताही वाढली होती. पण, आपण जिंकू शकतो किंवा आपल्याला जिंकायचे आहे ही मानसिकता ते दाखवू शकले नाहीत. त्यामुळेच आघाडी घेऊन पराभव पत्करणे हे भारताचे रडगाणे कायम राहिले.