पाकिस्तानने अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्ताकडून करण्यात आला आहे. त्याशिवाय पाकिस्ताननंही या हल्ल्याची पुष्टी करीत आम्ही अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानमधील तालिबानी सैन्यानंही पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हल्ल्याचं नेमकं कारण काय आहे? नेमकं काय घडतंय याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हेही वाचा – रशिया-युक्रेन युद्ध आणि जगासाठी पुतिन यांच्या रेकाॅर्डब्रेक विजयाचा अर्थ काय?

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला का केला?

शनिवारी (१६ मार्च) अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांनी पाकिस्तानाच्या उत्तर वजिरीस्तानमधील मीर अली सुरक्षा चौकीवर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात सात पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानातील हाफिज गुल बहादूर गटाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केलं. यावेळी पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर दोन हवाई हल्ले केले. मात्र, पाकिस्तानच्या या हल्ल्यात सात अफगाणी नागरिकही मारले गेले आहेत. त्यामध्ये चार महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधील हाफिज गुल बहादूर गटाच्या दहशतवादी गटांकडून पाकिस्तानी सैन्याला सातत्यानं लक्ष्य करण्यात येत आहे. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हल्ले करण्यात येत आहेत. डॉनच्या म्हणण्यानुसार, हाफिज गुल बहादूर हा पूर्वी पाकिस्तानमध्ये सरकारी कंत्राटदार होता. मात्र, २०१४ मध्ये तो पाकिस्तानातून अफगाणिस्तानमध्ये पळून गेला. तिथे त्यानं स्वत:चा दहशतवादी गट स्थापन केला.

दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये वाग्युद्ध

पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, तालिबाननं हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावरून दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये वाग्युद्ध सुरू झाल्याचं दिसत आहे. “पाकिस्तान सरकारच्या मनात अफगाणिस्तानच्या लोकांबद्दल प्रचंड आदर आहे. मात्र, अफगाणिस्तानात सत्तेत असलेल्यांपैकी काही जण दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत,” असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या या आरोपानंतर तालिबान प्रशासनानंही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. “पाकिस्ताननं त्यांच्या देशातील समस्यांसाठी अफगाणिस्तानला दोष देऊ नये. अशा घटनांचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात; जे पाकिस्तानच्या हिताचे नसतील, अशी प्रतिक्रिया तालिबान प्रशासनाचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी दिली आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संबंध बिघडण्याचे कारण?

तालिबाननं अफगाणिस्तानमधील सत्ता पुन्हा आपल्या हातात घेतल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. तालिबान अफगाणिस्तानमधील टीटीपीसह आणखी इतर दहशतवादी गटांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. विशेष म्हणजे टीटीपीसारख्या (तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान) दहशतवादी संघटनांच्या निर्मितीला पाकिस्तान जबाबदार आहे.

१९७० च्या दशकात पश्तून राष्ट्रवादाचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्ताननं उत्तर आणि पश्चिम पाकिस्तानात इस्लामिक कट्टरतेला पाठिंबा दिला. त्याचा परिणाम म्हणजे १९८० च्या दशकात अफगाणिस्तानात तालिबानचा उदय झाला. त्यावेळी अफगाणिस्तानची सत्ता सोविएत संघाच्या ताब्यात होती. मात्र, त्यानंतर काही वर्षांत सोविएत संघानं अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे २००१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता अमेरिकेच्या ताब्यात गेली. त्यावेळी पाकिस्तानला अमेरिकेच्या कृतीचं समर्थन करावं लागलं.

दरम्यानच्या काळात अमेरिकेचा पाकिस्तानमधील हस्तक्षेप वाढत असल्याचा दावा करीत पाकिस्तानातील कट्टरतावादी गटांनी टीटीपी या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. अफगाणिस्तानमधील टीटीपी गटानं आपण पाकिस्तानमधील संघटनेचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – विश्लेषण : केळी नामशेष होण्याची शक्यता टळली? ऑस्ट्रेलियातील संशोधन कसे ठरले फायदेशीर?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे अफगाण स्थलांतरीतांना पाकिस्तानमधून हद्दपार करण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळेच आम्ही अफगाण स्थलांतरीतांना पाकिस्तानातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे, असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशांतील संबंध बिघडण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे.