मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न ११ वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असून आजच्या घडीला मुंबईत ४ मेट्रो मार्गिका कार्यान्वित आहेत. तर नवी मुंबईतही मेट्रो धावते. पण उर्वरित ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न मात्र अद्याप पूर्ण झालेले नाही. आता मात्र लवकरच ठाणे जिल्ह्यातील आणखी एक मेट्रो कार्यान्वित होणार आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर-उत्तन मेट्रो ९ मार्गिकेवरील दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने या मार्गिकेचा हा आढावा…
३३७ किमीचे मेट्रोचे जाळे
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रोचा पर्याय पुढे आणला. आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरविणे आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा प्रकल्प हाती घेतला. यातील मेट्रो १ (घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा) आणि मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिका सेवेत आहे. त्याच वेळी सध्या मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाळे), ३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ), ४ (वडाळा-कासारवडवली), ४अ (कासारवडवली-गायमुख), ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण), ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी), ७ अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ), ९ (दहिसर ते भाईंदर) आणि १२ (कल्याण-तळोजा) चे काम सुरू असून लवकरच मेट्रो १० (गायमुख ते मिरारोड) या मार्गिकेचे काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी मेट्रो ८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ), १३ (शिवाजी चौक ते विरार) आणि १४ (अंबरनाथ ते बदलापूर) मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व १४ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईत ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही टोकावरून कुठे ही मेट्रोने जाता येणार आहे. अशात दिलासादायक बाब म्हणजे आता प्रस्तावित मेट्रो १०, मेट्रो १३ आणि मेट्रो १४ मार्गिकांची कामे हाती घेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मेट्रो ९ मार्गिका आहे कशी?
दहिसर – मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १३.५ किमी लांबीच्या मेट्रो ९ मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. ही मार्गिका दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार आहे, जो मुंबईतील पश्चिम उपनगरांना थेट मिरा-भाईंदर शहराशी जोडणार आहे. या मार्गिकेत १० स्थानकांचा समावेश असून या मार्गिकेच्या बांधकामासाठी ६६०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पूर्णतः उन्नत मेट्रो मार्गिका असलेल्या या मार्गिकेची कारशेड उत्तन येथील डोंगरी परिसरात असेल. मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे. दहिसर ते काशीगाव आणि काशीगाव ते डोंगरी असे हे दोन टप्पे असून सध्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. नुकतीच पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवर मेट्रो गाड्यांची चाचणी सुरू झाली आहे.
दहिसर ते काशीगाव टप्पा कसा आहे?
दहिसर ते मिरा-भाईंदर- उत्तन मेट्रो ९ मार्गिका १३.५ किमीची असून यातील दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा ४.५ किमी लांबीचा आहे. या पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशीगाव अशा चार मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. दहिसर ते काशीगाव अशा पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू असून आतापर्यंत या टप्प्याचे ९६ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सिग्नलिंग आणि विविध प्रणालींचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात?
दहिसर ते काशीगाव या ४.५ किमीच्या मार्गिकेतील ९६ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याने आणि तर प्रणालींचे, यंत्रणांचेही काम पूर्ण झाल्याने एमएमआरडीएने चाचण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० मे रोजी या टप्प्यातील विद्युत प्रवाह कार्यान्वित करण्यात आला. विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्याने चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार बुधवारी, १४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चाचण्यांस सुरुवात झाली. पहिल्यांदाच मेट्रो गाडी काशीगाव ते दहिसर अशी धावली. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी धावताना गाडीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री गाडीत उपस्थित होते.
डिसेंबरअखेरीस पहिला टप्पा वाहतूक सेवेत?
तांत्रिक चाचण्या आता पुढील काही महिने सुरू राहतील. दुसरीकडे मार्गिकेचे उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करत त्यानंतर रिसर्च डिझाईन अँड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) कडून प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मेट्रो संचलन करता येते. त्यामुळे हे प्रमाणपत्र डिसेंबरमध्ये मिळवित डिसेंबरअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा असणार आहे.