बारावीच्या परीक्षेदरम्यान यंदा कॉपी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या?
राज्य मंडळाकडून दरवर्षी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, शालेय शिक्षण प्रधान सचिव यांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भरारी पथकांची नेमणूक, परीक्षा केंद्रांवर बैठी पथके, परीक्षा केंद्रांवर आकस्मिक भेटी, राज्यभरातील तीन हजार ३७३ पैकी ८१८ केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित व्यक्ती बदलणे अशा उपाययोजना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण, ड्रोनचा वापर करण्यात आला. गैरप्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्याशिवाय जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.
कॉपीमुक्त अभियानात यंत्रणा वेठीला धरली जाते?
राज्य मंडळाची दहावी आणि बारावीची परीक्षा राज्यभरातील केंद्रांवर घेतली जाते. त्यामुळे शिक्षण विभागासह स्थानिक पातळीवर पोलीस, जिल्हा प्रशासनाचीही मदत घेतली जाते. परीक्षा केंद्रांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. त्याशिवाय जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असते. जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकांची, विभागीय मंडळात विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे या परीक्षांच्या आयोजनासाठी अन्य शासकीय यंत्रणाही काम करत असते. नियमित काम करतानाच या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठीचे अतिरिक्त काम यंत्रणेला करावे लागते.
परीक्षा पद्धतीत सुधारणा का गरजेच्या?
वर्षानुवर्षे ठरावीक पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांचे स्वरूप स्मरण, घोकंपट्टीवर आधारित असे आहे. आता राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये परीक्षांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे रूढ असलेली परीक्षा पद्धत बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करताना स्मरण, घोकंपट्टीवर आधारित परीक्षांची जागा क्षमता आधारित, संकल्पनांचे आकलन, संकल्पनांचे वास्तविक जगात उपयोजन अशा स्वरूपाचे असणे गरजेचे झाले आहे. केवळ गुणांची स्पर्धा होण्यापेक्षा ज्ञान, उपयोजनावर भर देण्याचा विचार व्हायला हवा. त्या दृष्टीने जगभरात अनेक ठिकाणी ओपन बुकसारख्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.
कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी ओपन बुक पद्धत कशी उपयुक्त ठरेल?
ओपन बुक पद्धतीमध्ये परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्यपुस्तके, अभ्यास साहित्य वापरण्याची मुभा असते. त्यातही दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे, परीक्षा घेणाऱ्या प्राधिकरणाने नेमून दिलेले किंवा परवानगी दिलेलेच अभ्यास साहित्य वापरणे. दुसरा प्रकार म्हणजे, विद्यार्थी त्यांच्या आवडीचे किंवा त्यांना उपयुक्त वाटणारे अभ्यास साहित्य परीक्षेवेळी घेऊन येऊ शकतात. ओपन बुक परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य वापरण्याची पूर्ण मोकळीक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृतपणे ‘कॉपी’ करता येते. परीक्षा काळात पोलीस बंदोबस्त, भरारी पथके आणि तत्सम उपाययोजना करण्याची गरज राहणार नाही. विद्यार्थ्यांना मोकळेपणाने संदर्भ साहित्याचा वापर करून उत्तरे लिहिणे शक्य होईल. स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण, दडपण येणार नाही. ओपन बुक ही पद्धत वरकरणी सोपी वाटली, तरी ती तितकी सोपी नाही. कारण केवळ संदर्भ साहित्य सोबत आहे म्हणून उत्तराची मांडणी विद्यार्थ्यांना नेमकेपणाने करता येईलच असे नाही, तसेच दिलेल्या वेळेतच प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर निर्माण होते.
ओपन बुकबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणतात, शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन असा त्रिकोण आहे. त्यामुळे मूल्यमापन पद्धत बदलायची असल्यास अध्ययन, अध्यापनाची पद्धतही बदलावी लागेल. ओपन बुक ही चांगली पद्धत आहे. मात्र ती विद्यार्थी, शिक्षकांच्या दृष्टीने तितकीच आव्हानात्मक आहे. कारण सध्या ज्या प्रकारे प्रश्नपत्रिका तयार केली जाते, त्याच पद्धतीने ओपन बुक पद्धतीसाठीच्या प्रश्नपत्रिका तयार करून चालणार नाहीत. ओपन बुक पद्धतीसाठी संकल्पनांचे उपयोजन मांडता येणारे प्रश्न असावे लागतील. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, आकलनाला, मांडणीला आव्हान देणारे असे प्रश्नांचे स्वरूप असणे आवश्यक आहे. तसेच उत्तरपत्रिकांच्या तपासणीची पद्धतही बदलावी लागेल. त्यामुळे ओपन बुक पद्धती स्वीकारायची झाल्यास सध्याची सर्व व्यवस्थाच बदलून संपूर्णपणे नव्याने विचार करावा लागेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुचवलेल्या परीक्षा सुधारणांचा विचार येत्या काळात करावा लागणार आहे. आपल्याकडे असणारी प्रचंड विद्यार्थिसंख्या पाहता ओपन बुक पद्धत आव्हानात्मक ठरू शकते.