७ मे आणि ८ मे रोजी अनुक्रमे मध्यरात्री आणि पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांतील लष्करी आस्थापनांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्युत्तर देणार याची कल्पना भारताच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला होतीच. त्यामुळे या ड्रोन हल्ल्याला कुचकामी ठरवण्यासाठी भारताची ड्रोन व क्षेपणास्त्र बचाव प्रणाली सज्ज होती. रशियाने भारताल्या दिलेल्या एस-४०० क्षेपणास्त्र बचाव प्रणाली अर्थात ‘सुदर्शन चक्रा’ने पाकिस्तानचे कुटिल मनसुबे हाणून पाडताना, भारतीय सैनिक आणि लष्करी इमारतींचे रक्षणही केले. याबरोबरच पाकिस्तानकडून पुन्हा कुरापती होऊ नयेत, यासाठी भारतानेही ड्रोन हल्ले करून लाहोर व इतर शहरांतील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली.
एस-४०० सुदर्शन चक्र…

रशियाने भारताला ‘एस-४०० ट्रायन्फ’ ही क्षेपणास्त्र बचाव प्रणाली गेल्या वर्षी दिली. जगातील अत्यंत मोजक्याच देशांकडे अशा प्रकारची प्रणाली आहे. ही प्रणाली भारताने रशियाकडून घेऊ नये अशी विनंती युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने केली होती. पण या विनंतीला प्रतिसाद न देता, भारताने स्वयंबचावाला प्राधान्य दिले. एस-४०० ट्रायम्फ चे नामकरण भारताने सुदर्शन चक्र असे केले. सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूंचे प्रमुख अस्त्र. त्याचा उल्लेख महाभारतासह अनेक पुराणग्रंथांमध्ये आहे. वेग, अचूकता आणि प्रलयक्षमता ही वैशिष्ट्ये सुदर्शन चक्र क्षेपणास्त्र बचाव प्रणालीतही अंतर्भूत आहेत. भारताने अशा पाच बचाव प्रणालींचा करार रशियाशी केला असून, त्यांतील पहिली २०२१मध्ये पंजाब सीमेवर तैनात करण्यात आली.

बहुद्देशीय आणि सुसज्ज

एस-४०० सुदर्शन चक्र प्रणाली ४०० किलोमीटर दूरवरून येणाऱ्या लक्ष्याला नष्ट करू शकते आणि ६०० किलोमीटरवर असलेल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. या प्रणालीमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. लढाऊ विमानांपासून ड्रोनपर्यंत आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून क्रूझ क्षेपणास्त्रांपर्यंत कोणत्याही वस्तूचा वेध ही प्रणाली घेऊ शकते. ही क्षमता तिला वैविध्यपूर्ण आणि अतिशय उपयुक्त बनवते. ए-४०० सुदर्शन चक्रावर अत्याधुनिक रडारयंत्रणा कार्यान्वित असते. एकाच वेळी १०० विविध लक्ष्यांचा वेध घेण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. ही मोबाइल लाँचरवर बसवलेली असल्यामुळे तीस लवचीकता प्राप्त होते. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी तिची हालचाल करता येऊ शकते. लष्करी आस्थापना आणि नागरी वस्त्यांचे रक्षण करण्याची ती क्षमता भारताला अभेद्य बनवते. शिवाय तिचे इलेक्ट्रॉनिक जॅमिंग करून तिला निरुपयोगी बनवणे जवळपास अशक्य आहे.

‘सुदर्शन चक्र’ काम कसे करते?

एस-४०० सुदर्शन चक्र प्रणाली भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत येते. कारण भारताच्या हवाई हद्दींचे आणि अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी हवाई दलाची असते. प्रत्येक एस-४०० स्क्वाड्रनमध्ये दोन दोन उपप्रणाली असतात. प्रत्येकामध्ये सहा क्षेपणास्त्र लाँचर्स किंवा प्रक्षेपक, एक रडार युनिट, एक कंट्रोल सेंटर असते. या उपप्रणाली हवाई दलाच्या मध्यवर्ती संपर्ककेंद्राशी संलग्न असतात. सध्या भारताकडे पाचपैकी तीन एस-४०० प्रणाली कार्यान्वित असून, उर्वरित दोन भारताकडे २०२६मध्ये दाखल होत आहेत. एकापेक्षा अधिक क्षेपणास्त्रे, स्वतंत्र रडार यंत्रणा हाताशी असल्यामुळे या यंत्रणेला ‘चुकवून’ क्षेपणास्त्रे डागणे शत्रूस जवळपास अशक्य असते. पाकिस्तानकडून १५ प्रक्षिप्तकांचा (ड्रोन आणि क्षेपणास्त्रे) मारा होऊनही प्रत्येक नष्ट करण्यात भारताला यश आले, यावरून एस-४०० सुदर्शन चक्र प्रणालीची क्षमता ध्यानात येते. एस-४००चा धसका घेऊन पाकिस्तानने त्यांच्याकडील सर्वांत महत्त्वाची एफ-१६ लढाऊ विमाने पाकिस्तानच्या पश्चिम सीमेकडे हलवल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेकडून दबाव, तरीही…

युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियावर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी बहिष्कार टाकला. या देशाशी व्यापार करणाऱ्या देशांनाही इशारे देण्यास सुरुवात केली. यात भारतही होती. तुम्हाला क्षेपणास्त्र बचाव प्रणाली आम्ही पुरवतो. पण रशियाकडून एस-४०० प्रणाली घेऊ नका, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. पण भारताने हा विनंतीवजा इशारा धुडकावून लावला. रशियाबरोबर यासंबंधी करार २०१८मध्ये झाला होता. तसेच चीनबरोबर कुरबुरी सुरू झाल्यानंतर आणि रशियाशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीचा मान राखून भारताने हा व्यवहार होऊ दिला. आज त्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.