चीनमधील थ्री गॉर्जेस या धरणावर जगातील सर्वांत मोठे जलविद्युत केंद्र उभारले गेले आहे. हे धरण केवळ त्याच्या अभियांत्रिकी चमत्कारासाठीच नव्हे, तर पृथ्वीच्या परिभ्रमणावरील संभाव्य प्रभावासाठीदेखील फार पूर्वीपासून आकर्षणाचा विषय ठरत आहे. आता चीन जगातील सर्वात उंच धरणदेखील विकसित करत आहे. चीनमधील जगातील सर्वांत उंच धरणाचे काम काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
चीनच्या सिचुआन प्रांतात शुआंगजियांगकोऊ जलविद्युत प्रकल्प विकसित होत असताना १ मे रोजीपासून या प्रकल्पात पाणी साठवणूक सुरू झाली आहे. पाणी साठवणूक सुरू होणे हा धरण कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे वृत्त ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ (एससीएमपी)मध्ये देण्यात आले आहे. चीनने उभारलेल्या सर्वांत उंच धरणाचा उद्देश काय? या धरणाचा जलप्रवाहावर परिणाम होणार का? त्याविषयी जाणून घेऊ.
चीनमध्ये कुठे बांधले गेले सर्वांत उंच धरण?
शुआंगजियांगकोऊ जलविद्युत प्रकल्प ३१५ मीटर उंच असून, त्याची साठवणूक क्षमता ११० दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण दरवर्षी २००० मेगावॉट वीजनिर्मितीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. २००० मेगावॉट इतकी वीज ३० लाखांहून अधिक घरांना वीज पुरविण्यासाठी पुरेशी असणार आहे. सिचुआन प्रांतातील आबा तिबेटी व किआंग स्वायत्त प्रीफेक्चरमध्ये स्थित असलेले हे धरण ३६ अब्ज युआन (४.९ अब्ज डॉलर्स) खर्चून बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जवळजवळ १० वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे दोन उद्देश असणार आहेत. एक म्हणजे वीजनिर्मिती आणि दुसरे पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन.

पूर्वेकडील तिबेटी पठारावरून सिचुआन बेसिनकडे वाहणाऱ्या दादू नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाची उंची ३१५ मीटर (१,०३३ फूट) इतकी आहे. त्यामुळे त्याची उंची जवळजवळ १०० मजली गगनचुंबी इमारतीइतकी आहे. हे धरण सध्याच्या जागतिक विक्रम असलेल्या सिचुआनमधील जिनपिंग-१ धरणापेक्षा १० मीटरने उंच आहे. प्राप्त माहितीत म्हटले आहे की, पहिल्या साठवण टप्प्याच्या पूर्णतेनुसार पाण्याची पातळी २,३४४ मीटरवर पोहोचली होती. हे धरण सुमारे ११० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ही साठवणूक क्षमता हांग्झूच्या प्रसिद्ध वेस्ट लेकच्या क्षमतेपेक्षा जवळजवळ आठ पट जास्त आहे.
नवीन वीज केंद्र कधी कार्यान्वित होणार?
प्रकल्प विकसित करणाऱ्या पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ चायना (पॉवरचायना)ने घोषणा केली की, हा प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या दिशेने प्रगती करीत आहे. पहिले युनिट २०२५ च्या अखेरीस वीज उत्पादन सुरू करील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा प्रकल्प एकदा कार्यान्वित झाल्यानंतर धरण२००० मेगावॉट वीज निर्माण करेल. ही वीज ३० लाख घरांसाठी पुरेशी असेल. पॉवरचायनाच्या वृत्तानुसार, या धरणामुळे उत्पादित होणारी अक्षय ऊर्जा दरवर्षी २.९६ दशलक्ष टन कोळशाचा वापर कमी करील आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन अंदाजे ७.१८ दशलक्ष टनांनी कमी होईल.
हा प्रकल्प एप्रिल २०१५ मध्ये मंजूर करण्यात आयल आणि त्याच वर्षी जुलैपासून या धरणाचे बांधकाम सुरू झाले. धरणाची उंची, समुद्रसपाटीपासून २,४०० मीटरपेक्षा जास्त उंच आणि भूगर्भीयदृष्ट्या खडबडीत भूभाग असल्यामुळे या प्रकल्पासमोर अनेक अभियांत्रिकी अडथळे आले. ‘चायनीज अकादमी ऑफ इंजिनियरिंग’ने प्रकाशित केलेल्या अभियांत्रिकी विषयातील २०१६ च्या एका पेपरमध्ये गळती व निचरा नियंत्रित करणे आणि धरणाच्या मुख्य संरचनेचे बांधकाम यांसारख्या प्रमुख तांत्रिक आव्हानांविषयी सांगण्यात आले. या समस्यांवर मात करण्यासाठी, अभियंत्यांनी रोबोटिक्स, 5 जी प्रणाली आणि अत्याधुनिक उपायांचा वापर केला आहे.
जागतिक धरण बांधणीत चीनचे स्थान
धरणबांधणीत चीन जगात आघाडीवर आहे. चीनने १९५० पासून १५ मीटरपेक्षा जास्त उंचीची २२,००० हून अधिक धरणे बांधली आहेत. धरणांची ही संख्या जगातील एकूण धरणांच्या तुलनेत जवळजवळ निम्मी आहे. त्यापैकी बहुतेक मोठ्या धरणांचे बांधकाम नैऋत्येला करण्यात आले आहे. ही सर्व धरणे यांगत्झे, लानकांग व जिन्शा यांसारख्या नद्यांवर तयार करण्यात आले आहे.
चीनच्या धरणामुळे भारतातील जलप्रवाहावर परिणाम?
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर (तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याची योजना जाहीर केली होती. हे धरण म्हणजे जगातील सर्वात मोठे थ्री गॉर्जेस धरण. या निर्णयामुळेभारतासह बांगलादेशची चिंता वाढली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी या वर्षी जानेवारीमध्ये माहिती दिली की, या प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यांनी आश्वासन दिले की, धरणाचा नदीच्या खालच्या भागातील देशांच्या पर्यावरण, भूगर्भशास्त्र किंवा पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. मुख्य म्हणजे चीनने असेही स्पष्ट केले की, हा प्रकल्प आपत्तीच्या काळात प्रभावी ठरेल आणि प्रदेशातील हवामान बदलांना तोंड देण्यास मदत करील.