Gauri Ganpati Pujan 2023 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी घरोघरी गौरींचे आगमन होते. यालाच आपण ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणतो. तीन दिवस असलेल्या या गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे. राज्यात वेगवेगळ्या भागांत पूजेची पद्धत वेगवेगळी असते. महाराष्ट्रातील विदर्भ भागात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजन म्हटले जाते. विदर्भात गौरी पूजन कसे करतात, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

गौरी आवाहन

विदर्भात गौरी आवाहनाच्या दिवशी महालक्ष्मीचे आगमन होते. महालक्ष्मीचा साजशृंगार करून त्यांची स्थापना केली जाते. त्यानंतर त्यांना चहापाण्याचा नैवेद्य दाखवला जातो. रात्री महालक्ष्मींना अंबाडीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.
हा महालक्ष्मीचा पहिला दिवस असतो. घरोघरी पाहुणे आलेले असतात. सगळीकडे प्रसन्न आणि उत्साही वातावरण असते.

हेही वाचा : Ganpati Bappa : गणपतीपासून शिका फक्त ‘या’ पाच गोष्टी, तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल…

गौरी पूजन

दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते. या दिवशी महालक्ष्मींसाठी पंचपक्वान्न केले जातात. महालक्ष्मीला बघण्यासाठी घरी पाहुणे, आप्तस्वकीय येतात. याच दिवशी महिला हळदी कुंकूसाठी एकमेकांच्या घरी जातात. सौभाग्यवती महिला महालक्ष्मीची ओटी भरतात.
पंचपक्वान्नमध्ये विविध प्रकारचे ‘छपन्न भोग’ चढवतात. यात मोदक, पुरणपोळी, अळुची भाजी, उडीद-मुगाचे वडे, कोशिंबीर, चटण्या, खीर, भजी, कढी, आंबील, पंचामृत, १६ भाज्यांपासून तयार केलेली भाजी, कटाची आमटी, लोणचे, लाडू, करंज्या, भात-वरण अशा विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवला जातो. सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. विदर्भात आंबीलच्या प्रसादाला सर्वाधिक महत्त्व आहे.

संध्याकाळी महालक्ष्मीची आरती केली जाते. आरतीनंतर सर्व दारे खिडक्या बंद केले जातात आणि महालक्ष्मींना जेवायला वेळ दिला जातो. तोवर घरातील सर्व मंडळी बाहेर असतात. विदर्भात अशी मान्यता आहे की, महालक्ष्मीला जेवताना कोणीही पाहू नये.

हेही वाचा : VIDEO : गणेशोत्सवादरम्यान काढा एकापेक्षा एक भारी गणपतीच्या रांगोळ्या, एकदा व्हिडीओ पाहाच..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरी विसर्जन

या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. विसर्जनाच्या दिवशी भाजी पोळी, दही भात, कानोल्याचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या वेळी महालक्ष्मीला काही खायचे पदार्थ शिदोरी म्हणून देतात. महालक्ष्मीची आरती करून पुढील वर्षी येण्याचे तिला आमंत्रण दिले जाते आणि निरोप घेतला जातो. महालक्ष्मी उठताना त्यांच्या गळ्यात २१ पानांची माळ घातली जाते. अशा प्रकारे तीन दिवस राहून त्या परत सासरी जातात.