शाकाहारातून प्रथिने फारशी मिळत नाहीत, त्यामुळे मांसाहार केलाच पाहिजे, असा अनेकांचा समज असतो. तसेच मांसाहाराचे आहारातील प्रमाण किती असावे, याबाबतही मनात संभ्रम असतो. मात्र मांसाहार करावा की शुद्ध शाकाहार, हा नेहमीचा वादाचा विषय असला तरी मांसाहाराचा अतिरेक झाल्यास त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात हे नक्की.
प्रथिनांचा अतिरेक शरीराला अपायकारक
अन्नातून मिळणाऱ्या उष्मांकांपैकी (कॅलरी) सुमारे ८० टक्के कबरेदकांमधून, ६ ते ८ टक्के प्रथिनांमधून आणि उरलेले स्निग्ध पदार्थामधून मिळायला हवेत. मांसाहारात कबरेदके जवळजवळ नसतात, तर प्रथिने आणि चरबीचे प्रमाण अधिक असते. अन्नात कबरेदके कमी आणि प्रथिनेच अधिक घेतली तर रक्तातील आम्लता वाढते. ती कमी करण्यासाठी हाडातील कॅल्शियम रक्तात खेचून घेतले जाते आणि त्यानंतर कॅल्शियम आणि जास्तीची प्रथिने लघवीवाटे उत्सर्जित केली जातात. परिणामी हाडे ठिसूळ बनतात, मुतखडय़ाचा धोका वाढतो आणि मूत्रपिंडावर ताणही पडतो. अतिमांसाहार केल्यामुळे जास्तीचे युरिक अॅसिड तयार होऊन ते सांध्यांमध्ये साठून राहते आणि त्यामुळे सांधेदुखी जडू शकते. या आजाराला गाऊट म्हणातात.
स्निग्ध पदार्थाचाही अतिरेक नको
कमी घनतेचे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराईडस् या घटकांचे रक्तातील प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक वाढले तर ते हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरते. प्राणिज स्निग्ध पदार्थामध्ये अशा अपायकारक घटकांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, धमन्यांच्या भिंतींची जाडी वाढवणारा अॅथेरोस्क्लेरॉसिस असे विकार टाळण्यासाठी शक्यतो मांसाहार टाळावाच. शाकाहारी व्यक्तीनींही दूध, तूप आणि दुधाचे पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
शाकाहारातील प्रथिनेही उच्च दर्जाची
अमायनो आम्लांच्या कमतरतेमुळे शाकाहारातील प्रथिने कमी दर्जाची मानली जातात. शाकाहारातील विविध पदार्थामध्ये असलेल्या प्रथिनांचा वेगवेगळा विचार केला तर हे विधान खरे ठरेल. मात्र भारतातील किंवा जगातील इतर काही देशांमधील परंपरागत शाकाहारी भोजनाचा विचार करता त्यात तृणधान्ये आणि कडधान्ये यांचा एकत्रित वापर केला जात असल्याचे दिसेल. तृणधान्ये आणि कडधान्ये एकमेकांच्या प्रथिनांमधील अमायनो आम्लांची कमतरता भरून काढतात. त्यामुळे केवळ मांसाहारातूनच शरीराची प्रथिनांची गरज भरून निघते हे चुकीचे असून योग्य तऱ्हेने घेतलेल्या शाकाहारातूनही ती सहजपणे भागवता येते.
शाकाहारात तंतुमय पदार्थ भरपूर
आतडय़ांमध्ये चयापचय सुकर होण्यासाठी अन्नात तंतुमय पदार्थ आणि चघळचोथा पुरेशा प्रमाणात असावा लागतो. तंतुमय पदार्थाच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठ, मूळव्याध आणि कोलायटिससारख्या तक्रारी उद्भवू शकतात. मांस, मासे, अंडी यात तंतूमय पदार्थाचे प्रमाण अगदी कमी असते; तर वनस्पतिज पदार्थामध्ये ते भरपूर प्रमाणात असतात. पण हे तंतू शरीराला मिळण्यासाठी शाकाहार योग्य प्रमाणात घेतला जाणे फार आवश्यक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
मांसाहाराचा अतिरेक हानिकारक!
शाकाहारातून प्रथिने फारशी मिळत नाहीत, त्यामुळे मांसाहार केलाच पाहिजे, असा अनेकांचा समज असतो.
First published on: 28-01-2014 at 06:05 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont eat to much nonveg