आवरायला, थांबवायला सर्वात कठीण भावना कोणती? यावर जगभरात एकमत आहे. ती भावना म्हणजे ‘राग’. यावरून हे स्पष्ट होते की राग ही भावना स्फोटक, जोरात बाहेर पडणारी आहे आणि काहीवेळा ती नको असलेला परिणाम, गडबड किंवा बिघाड निर्माण करते. आनंद, समाधान, प्रेम यांना आपण सकारात्मक व चांगल्या भावना मानतो. त्यांना मनातून घालवायचा प्रयत्न करत नाही. ज्या भावनांमुळे त्रास होतो, त्यांना आपण नकारात्मक भावना मानतो उदा. दुख, भीती, निराशा, द्वेष. रागालाही आपण नकारात्मक भावना मानतो. मात्र अन्य नकारात्मक भावना व्यक्त करण्यापेक्षा त्या लपवण्याचा प्रयत्न करत असतो. पण रागाच्याबाबतीत मात्र हे कठीण जाते.
दहावीत असलेल्या मुलांच्या पालकांशी एकदा बोलताना मी त्यांना विचारले की, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुले नाही वागली, अभ्यास नाही केला तर तुम्हाला काय वाटते? सर्वाचे उत्तर होते की राग येतो. मग आम्ही मुलांना खूप बोलतो, ओरडतो, मारतो. मग मी या पालकांना विचारले की, मुलांनी न ऐकल्यावर फक्त रागच येतो का? थोड्या शांततेनंतर उत्तरे आली की वाईट वाटते, दुख होते, काळजी वाटते, भीती वाटते, निराश वाटते. पण बहुतांश पालक या भावना मुलांपर्यंत न पोहोचवता केवळ रागच व्यक्त करतात आणि याचा मुले व पालक यांच्या नात्यावर परिणाम होतो.
खरे म्हणजे, या इतर त्रासदायक वाटणाऱ्या भावना व्यक्त न केल्यामुळे त्या साचत जातात. प्रेशर कुकरसारखी अवस्था होते. आतले प्रेशर खूप वाढल्यानंतर मग स्फोट होतो. दिसताना फक्त राग दिसतो. ताणाचा फक्त मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम होतो. असाच परिणाम झालेली एक स्त्री तिच्या सासूच्या वागण्याबद्दल तक्रारी सांगत होती. ‘मला सासूचा भयंकर राग येतो. ती डोळ्यासमोरच नको असे वाटते. मी सोडणार नाही. ऐकवल्याशिवाय राहणार नाही.’ वगैरे वगैरे. सासूचे किस्से सांगताना तिचा चेहरा लाल झाला होता. ऐकत असताना मध्येच म्हणालो, तुम्हाला खूप दुखावल्या गेल्यासारखे वाटते आहे ना? हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले. पाहा, त्या म्हणत होत्या की, राग येतो पण खरी भावना ही दुखावल्या गेल्याची होती. मग आम्ही त्यावर चर्चा केली. हे जे तुम्हाला वाटते ते तुम्ही एकदा सासुला सांगा, असा सल्ला मी दिला. हे त्यांना अशक्यच वाटत होते. मग कसे सांगता येईल यावर विचार व थोडी रिहर्सलसुद्धा केली. संधी मिळाल्यावर त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या सासूबाईना सांगितले. सासूबाईनी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण नंतर त्यांच्या वागण्यात थोडा बदल झाला, असे यांना जाणवले. त्याहूनही आपण बोललो यानेही त्यांना हलके वाटले. निचरा झाला. न भांडतासुद्धा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींबद्दल बोलता आले. अनेकदा आपल्या इतर भावना व त्रास त्या वेळी व्यक्त न केल्यामुळे शेवटी तो इतरांना कळावा म्हणून रागाचाच वापर करतो. आणि बिचारा राग बदनाम होतो. आपण जर जाणवणाऱ्या इतर भावना नीट व्यक्त करू शकलो तर रागापर्यंत चढण्याची वेळच येणार नाही. शास्त्रीय संगीतात जे राग मानले जातात, त्या राग या शब्दाचा अर्थ रंगवणे असा आहे. भावनांचे रंग. भावनांच्या किती छटा, शेड्स असतात. त्या न पाहता आपण एकच लेबल वापरतो व गफलत होते. आपल्या भावनांना योग्य नावाने ओळखायची सवय करायला हवी. जर आपण स्वतला प्रश्न विचारला की जेव्हा मला राग आला होता तेव्हा फक्त रागच आला होता का? इतर भावना कोणत्या होत्या? त्या मी इतरांपर्यंत कशा पोहचवू शकेन? कशा व्यक्त करू? त्यासाठी लागल्यास मदत घ्या. व्यक्त करायच्या आधी रिहर्सल करा (सवय नसल्यास याची गरज लागते). मग पाहा रागाचे काय होते ते. तुमचे अनुभव कळवा.
psychologistarun@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
रागाचे खरे कारण!
आवरायला, थांबवायला सर्वात कठीण भावना कोणती? यावर जगभरात एकमत आहे. ती भावना म्हणजे 'राग'.
First published on: 11-02-2014 at 06:41 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the exace reason behind anger