आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झालेली नाहीये. आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत मुंबईला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. संघातल्या प्रमुख खेळाडूंना येणारं सततच अपयश हे मुंबईच्या पराभवामागचं कारण ठरतं आहे. हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सामन्यात मुंबईला ११९ धावांचं आव्हानही पार करता आलेलं नाही. संघाचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेही आपल्या खेळा़डूंच्या कामगिरीवर नाराज आहे, पांड्या सारख्या तरुण खेळाडूंनी परिस्खितीनुरुप आपल्या शैलीत बदल करण्याची गरज असल्याचं जयवर्धनेने म्हटलं आहे.

अवश्य वाचा – मुरलीधरनच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात राशिद खानने केली कमाल

सामन्यात खेळत असताना, परिस्थीतीचा विचार करुन पावलं टाकणं हे सर्व खेळाडूंना जमलं पाहिजे. विशेषकरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या हार्दिक पांड्यासारख्या गोलंदाजांनी प्रसंगानुरुप स्वतःची शैली बदलणं गरजेचं आहे, असं न झाल्यास तुमच्या कामगिरीत सातत्य राहणार नाही. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जयवर्धनने आपली खंत व्यक्त केली.

अवश्य वाचा – IPL 2018 : पराभवासाठी जबाबदार आम्हीच, संघाच्या कामगिरीवर रोहित नाराज

हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला ११९ धावांचं आव्हान पेलवता आलेलं नाही. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज हैदराबादच्या माऱ्यासमोर तग धरु शकला नाही, यामुळे ३१ धावांनी हैदराबादचा संघ सामन्यात विजयी ठरला. पाच पराभवांमुळे मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई आपला पुढचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध शनिवारी पुण्याला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी संघात काही बदल करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.