चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विराट कोहलीला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना विराटच्या संघाने आठ बाद २०५ धावांचा डोंगर उभा केला.

पण एमएस धोनीने ३४ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी करुन आरसीबीच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. आयपीएलच्या आदर्श अचारसंहितेनुसार षटकांची गती राखण्याबाबतचे जे नियम आहेत त्यामध्ये यंदाच्या मोसमात आरसीबीने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी कोहलीला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. असे आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान महेंद्रसिंग धोनीने ३४ चेंडूत ७ षटकारांची आतषबाजी करत फटकावलेल्या नाबाद ७० धावा आणि ५३ चेंडूत ८२ धावांची दमदार खेळी करणारा अंबाती रायडू यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हीलियर्स यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, २०६ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने धोनी आणि रायडूच्या खेळीमुळे २ चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली.