विराट कोहलीचा बंगळुरू संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. RCBने १० पैकी ७ सामने जिंकून १४ गुण कमावत TOP 4मध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचा प्ले-ऑफ्समधील प्रवेश निश्चित होणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघात एक महत्त्वाचा फरक दिसून आला. बंगळुरूच्या संघाने नियमित लाल रंगाच्या जर्सीऐवजी हिरवी जर्सी परिधान केली होती. यामागचे कारण पर्यावरण आणि झाडांबद्दल सर्वांमध्ये जागरूकता (Go Green Initiative) निर्माण करणं हे आहे.

प्रत्येक स्पर्धेत एका सामन्यासाठी बंगळुरूचा संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून सामना खेळतो. २०११पासून बंगळुरूचा संघ हा स्तुत्य उपक्रम करतो आहे. गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध तर २०१८ ला राजस्थानच्या संघाविरूद्ध बंगळुरूने हिरवी जर्सी परिधान करून सामना खेळला होता.