कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने जिल्ह्यामध्ये आठवडाभर कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारपासून याला सुरुवात झाली असताना कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजाराकडे जात आहे. तसेच मृतांची संख्या ५५ झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाद्वारे लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आज सोमवारपासून कोल्हपूर जिल्ह्यात एक आठवडा लॉकडाउन सुरू असणार आहे. या कालावधीत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे सोमवारच्या सकाळी कोल्हापूर शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. सकाळी केवळ वृत्तपत्र, दूध यांचे वाटप झाले. ही कृती वगळता अन्यत्र लोकांचा वावर पूर्णत: थांबला होता. संचारबंदी अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रशासनाचा इरादा आहे. त्यामुळे शहरात सात ठिकाणी बॅरिकेड लावून रस्ते, महत्त्वाचे चौक सील करण्यात आले आहेत. सुमारे दोन हजार पोलिस बंदोबस्तावर दाखल झालेले आहेत. या सेवा राहणार सुरू जिल्ह्यात उद्यापासून पासून ७ दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार, सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील तसेच बँक एटीएम, कॅश रिप्लेसिंग एजन्सी (CRA) ची कामे सुरु राहतील. दूध संकलन व वाहतूक सुरु राहील (वेळेची मर्यादा नाही) आणि ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खासगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना ५० टक्केकर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. नियमभंग गेल्यास फौजदारी कारवाई या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे. महापालिकेची सभा रद्द शहरामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यामध्ये ७ दिवस लॉकडाउन आदेश जारी केला असल्याने आज (सोमवार) होणारी कोल्हापूर महापालिका सभा तहकूब करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून सकाळी देण्यात आली.