दयानंद लिपारे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बिहारचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून  काँग्रेसला धक्का दिला तसाच राष्ट्रवादीसाठीही धक्काच आहे. पाटील यांनी हाताला रामराम ठोकून घडय़ाळ बांधण्याचे कोणतेही कारण पुढे आलेले नाही. राज्यपालपदापर्यंत मजल मारलेल्या पाटील यांना राष्ट्रवादी या वयात काय देणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, ज्या पद्धतीने प्रवेश दिला आहे त्यावरून अनेक प्रश्न मात्र उपस्थित झाले आहेत.

पाटील यांना वयोमानानुसार विस्मरण होऊ लागले असताना त्यांच्या कुटुंबीयाशी कोणतीही चर्चा न करता गुपचूपपणे प्रवेश उरकून टाकल्याने वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. सावध नसलेल्या व्यक्तीला बेसावध क्षणी गाठून केलेली राजकीय कूटनीती आजच्या राजकारणाचा दर्जा अधोरेखित करणारा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात हात घेऊन निवडणूक लढवायच्या ठरवल्या असताना काँग्रेसी प्रवृत्तीचे पायात पाय घालण्याचे राजकारण यानिमित्ताने पुन्हा उफाळून आले आहे.

विनाअनुदान तत्त्वावर शिक्षण संस्था काढण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी घेतला. त्यातून प्रेरणा घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्थेचे जाळे पसरवण्यात दोघा जणांची विशेष ख्याती राहिली. पहिले दिवंगत डॉ. पतंगराव कदम दुसरे डॉ. डी. वाय. पाटील. त्यांनी देशातच नव्हे तर विदेशातही शिक्षण संस्था सुरू केल्या. याचबळावर कोल्हापूरचे महापौर, आमदारपद भूषवलेले डॉ. पाटील पुढे काँग्रेसच्या सत्ताकाळात त्रिपुरा-बिहार राज्याचे राज्यपाल बनले. काँग्रेसची सत्ता गेल्यावर ते पुन्हा आपल्या शिक्षण संस्थांच्या साम्राज्यात गढून गेले. काँग्रेसच्या संपर्कात ते राहिले पण पूर्वीची सक्रियता तीत नव्हती. राजकारणाची सूत्रे त्यांनी सुपुत्र,  माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सोपवली. अधूनमधून राजकीय भाष्य करून खळबळ उडवून देत असत. अलीकडे त्यांनी एकदा सतेज पाटील यांनी भाजपात जावे अशा आशयाचे विधान केले तर एकदा शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे असे मत व्यक्त करीत त्यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त केले होते. पवार यांच्या इशाऱ्यावरूनच डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यावरून चर्चेला तोंड फुटले आहे.  कोणी कोणत्या पक्षात प्रवेश करावा आणि हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक मामला आहे. पण काँग्रेसही निष्ठा बाळगणाऱ्या डॉ. पाटील यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश करावा हे आश्चर्य आहे. पाटील यांचे अलीकडच्या काळातील वर्तन विशेषत: त्याचे विस्मरण याचीही खासगीत चर्चा होत राहिली. अलीकडे समारंभात पाटील हे मुद्दा सोडून भलत्याच विषयावर बोलताना दिसले. त्यांना थोडय़ा वेळापूर्वी बोलल्याचे स्मरणात राहत नाही हे ओळखून धूर्त खेळी करण्यात आली आहे. एखादा माजी आमदार, नगराध्यक्ष पक्षात प्रवेश करणार असेल तर ढोलताशे वाजवीत आणि पक्षातील वरिष्ठांच्या उपस्थितीत समारंभ घडवून आणला जातो. मात्र डॉ. पाटील यांच्यासारखी बडी असामी पक्षात प्रवेश करीत असताना या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही इतक्या गोपनीयतेच्या उरकला जातो, यावरूनच संशयाला जागा उरते.

लोकसभेच्या आखाडय़ाचे बेरजेचे राजकारण

कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा उघड विरोध आहे. पवार यांनी मात्र महाडिक यांच्या उमेदवारीच्या बाजूने कल दाखवला आहे  मात्र, सतेज पाटील यांच्या विरोधाची भूमिका कायम असल्याने बेरजेच्या राजकारणाचे पाऊल म्हणून पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा ‘कार्यक्रम’ घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पुढे जाऊन पाटील यांना पक्षाच्या मंचावर आणायचे आणि सतेज पाटील यांची कोंडी करायची अशी खेळी आहे. बेरजेच्या राजकारणाच्या नावाखाली बेरकी राजकीय घडामोडी झाल्याचे दिसत आहे. पाटील यांच्या प्रवेशाचे अजित पवार यांच्यापाठोपाठ खासदार महाडिक यांनी स्वागत केले आहे. मात्र, कोल्हापुरातील पक्षाचे बडे प्रस्थ असलेले माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र याची कानोकान खबर नसावी या योगायोग असल्याचे मानण्यास कोणीही तयार नाही.

‘डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याबाबत आपल्याला मुळीच कल्पना नाही. अंकुश काकडे यांच्याकरवी प्रवेश झाला इतकेच मला समजले आहे. या स्थितीत पाटील परिवाराशी संवाद साधणेही अवघड वाटत आहे. बुधवारी पक्षाची बैठक पुणे येथे होणार असून त्या वेळी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून माहिती घेणार आहे,’ असे हसन मुश्रीफ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा अनपेक्षित आहे. ८४ व्या वर्षी त्यांच्या वयाचा व तब्येतीचा विचार करता त्यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे, हे अपेक्षित नाही. कुटुंब म्हणून आमच्या सर्वासाठी हा निर्णय आश्चर्यकारक आहे. हा निर्णय होत असताना राष्ट्रवादीने कुटुंबातील लोकांच्या कानावर हा विषय घालणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही याचे वाईट वाटते. आपण मात्र भविष्यातही काँग्रेसचे कार्य जोमाने करीत राहणार आहे.’

– आमदार सतेज पाटील, काँग्रेस आमदार आणि डी. वाय. पाटील यांचे पुत्र

कोल्हापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.