शरद सहकारी साखर कारखान्याच्या वतीने डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्प येत्या दीड वर्षांत उभा करण्याचा संकल्प केला आहे. दोन्ही प्रकल्प कमी खर्चात उभे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्तम ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली जाईल. असे मत या कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले. कारखान्याची गाळप क्षमता २५०० इतकी आहे. सतत यंत्रसामग्री आधुनिक करीत नवीन बदल केले आहेत. त्यामुळे गाळप क्षमता वाढली आहे. लवकरच स्वनिधीतून कारखाना ५००० क्षमतेचा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नरंदे, ता. हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०व्या वार्षकि सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. नियोजित प्रकल्पाविषयी राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, सहवीज निर्मितीसाठी अंदाजित २७ कोटी ३४ लाख अपेक्षित होता; परंतु काटकसरीने तो १४ कोटी ६५ लाख रुपयांत हा प्रकल्प उभा केला. यामध्येही निम्मे कारखान्याचे स्वभांडवल आहे. उर्वरित कर्ज घेतले आहे. हा प्रकल्प येणाऱ्या काळात प्रतिदिन अंदाजे १० लाखांची वीज शासनाला देईल. शेतकरी कष्टातून ऊस पिकवतो. त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी कारखाना नेहमीच आघाडीवर राहिला आहे. गतहंगामात सहा लाख ११ हजार ४०० टनांचे गाळप केले. १२.७१ टक्के उताऱ्याने सात लाख ७५ हजार ३५० िक्वटल साखरेचे उत्पादन केले. एफ. आर. अनुषंगाने प्रतिटन २४७७ रुपये अदा केले आहेत. शासनाकडून ४५ रुपयांचे अनुदान मिळताच तेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.