कोल्हापूर जिल्ह्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा शनिवारी मुंबईत उमटला. जिल्ह्यातील ८ नगरपालिका हागणदारी मुक्त केल्याबद्दल विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते कागलच्या नगराध्यक्षा संगीता गाडेकर, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की व जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाने देशातील १० शहरे हागणदारी मुक्त घोषित केली असून त्यात महाराष्ट्रातील ५ पकी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, मुरगूड व पन्हाळा या तीन शहरांचा समावेश आहे. राज्य शासन व एन.डी.टी.व्ही यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाक्लीनीथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, एन.डी.टी.व्ही.चे प्रादेशिक संचालक नितीश कपूर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या प्रभावी जनजागृती बरोबरच प्रत्यक्षपणे स्वच्छतेचे काम करणाऱ्यांचे कौतुक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन अमिताभ बच्चन म्हणाले,की व्यक्तिगत वातावरण स्वच्छ राहिल्यास त्याचा परिणाम परिसरावरही होतो. प्रत्येकाने आपल्या घराबरोबरच घराच्या परिसरातील १० फूट परिसर स्वच्छ केला तरी संपूर्ण शहर स्वच्छ होईल. व्यक्तिगत स्वच्छतेतून देश स्वच्छ होईल. स्वच्छ भारत अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असून लोकांचा विशेषत: महिलांचा सकारात्मक उत्स्फूर्त सहभाग आहे, असे गौरवोद्गारही बच्चन यांनी काढले. सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर म्हणाल्या, हे अभियान यशस्वी करण्यासाठी सुमारे ६० लाख मनुष्यतास खर्च करण्यात आले आहेत. केवळ शौचालय बांधणे हे या अभियानांतर्गत अपेक्षित नसून लोकांचा सहभाग घेतल्यानेच हे अभियान १०० टक्के यशस्वी झाले आहे. पुढील दोन वर्षांत ५० शहरे हागणदारी मुक्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आठ नगरपालिका स्वच्छतागृहयुक्त जिल्ह्यतील एकूण ९ नगरपालिकांपकी ८ नगरपालिकांमध्ये १०० टक्के घरे ही स्वच्छतागृहयुक्त झाल्याने उघडय़ावरील हागणदारीतून ही शहरे मुक्त झाली आहेत. यामध्ये पन्हाळा, कागल, मुरगूड, मलकापूर, पेठ वडगाव, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि गडिहग्लज यांचा समावेश आहे.