कोल्हापूर : आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदायी ठरणारा आंबेओहळ प्रकल्पात पावसामुळे यंदा पहिल्यांदाच जलसंचय झाला आहे. २२ हून अधिक गावांना लाभदायक ठरणाऱ्या हा प्रकल्प पहिल्याच पावसाने ३० टक्के भरला असल्याने ग्रामस्थांचे मन भरून आले आहे. कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे पाणी दहा वर्षांत अडवले नव्हते. आंबेओहळ प्रकल्पाच्या रूपाने हे पाणी अडविण्यात यश मिळाले. या प्रकल्पाची सहा हजार हेक्टर सिंचन क्षमता आहे. सातपैकी सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण झाले असून एका बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाच्या रूपाने जनतेचे पांग फेडण्याची संधीच परमेश्वराने मला दिली, अशी भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. येत्या आठवडय़ात महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिबिर आयोजित करून उर्वरित पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुश्रीफ यांनी दिले. प्रकल्पाला गती दिल्याबद्दल महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा मुश्रीफ यांनी कृतज्ञतापर सत्कार केला. उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी अधिकारी उपस्थित होते. पुनर्वसनाचा प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन वाटपासाठी ३८ हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यापैकी २२ हेक्टर जमीन शिल्लक आहे. अधिकाऱ्यांनी जमिनीची गुणवत्ता तपासावयाची आहे. ३५ शेतकऱ्यांची जमीन मागणी असून ३१ शेतकऱ्यांनी पॅकेज मागणी केली आहे. परंतु महसूल विभागाने वारंवार पत्र लिहूनही लाभार्थी आले नसल्याने करारनामे करण्यामध्ये अडचणी येत आहेत.