कोल्हापूर : एकीकडे केंद्र, राज्य पातळीवर शासकीय योजनांचा धडाका उडत असला, तरी दुसरीकडे कृषी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनांविषयी पुरेशी माहिती नसते. यासाठी या विद्यार्थ्यांना आता कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) सुरू करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यामुळे २५ हजारांवर विद्यार्थ्यांना शासनाच्या कृषी विभागातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाचा अनुभव मिळेल.
शेतकऱ्यांचा गरजा लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत विविध उपक्रमांची आणि प्रकल्पांची आखणी तसेच अंमलबजावणी केली जाते. अशा उपक्रमांची यशस्विता वाढवण्यासाठी, अद्ययावत संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाची जोड या उपक्रमांना मिळणे गरजेचे असते. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (२०२०) शैक्षणिक अभ्यासामध्ये आंतरवासिता उपक्रम हा महत्त्वाचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे.
हेतू कोणता?
राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संलग्न पदवीच्या महाविद्यालयांतून १३८८, पदव्युत्तर पदवीधर महाविद्यालयांतून सुमारे २० हजारांवर विद्यार्थी पदवी प्राप्त करतात. पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या कृषी विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सामील झाल्यास त्यांच्या अद्ययावत ज्ञानाचा फायदा कृषी विभागास व पर्यायाने शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे ग्राम ते राज्यस्तरापर्यंत विविध कार्यालयांमध्ये चार ते सहा आठवड्याचे कार्यप्रशिक्षण करण्याची सुविधा आता उपलब्ध करण्यात आली आहे.
कोठे काम करता येणार ?
राज्यस्तरावर कृषी विभाग, कृषी आयुक्तालय, कृषी शिक्षण व संशोधन परिषद, कृषी औद्योगिक विकास महामंडळ, विभाग स्तरावर विभागीय कृषी कार्यालय, कृषी सहसंचालक, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन, कृषी विद्यापीठे, जिल्हास्तरावर कृषी अधीक्षक, उपविभाग स्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी, फळरोप वाटिका, तर ग्रामीण भागात कृषी सहायक आदी विविध ठिकाणी कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण करता येणार आहे.
कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षातील एक सत्र कृषी कार्यानुभवाचे असते. त्यात शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले जातात. आता आणखी एका सत्रातून शासकीय कार्यालयातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून, तो त्यांच्या ज्ञानकक्षा वाढवण्यास साहाय्यभूत ठरेल. – डॉ. अशोक पिसाळ, विस्तार कृषि विद्यावेत्ता, कोल्हापूर</strong>
कोविडनंतर कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाल्याचे निरीक्षण आहे. त्यांना शासकीय योजनांची पुरेशी कल्पना नसते. अशा विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणातून शासकीय कामकाज कशा पद्धतीने चालते, शेतकऱ्यांच्या अपेक्षा, कामांचा निपटारा आदीबाबतचा तेथ अनुभव मिळणार असल्याने या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले पाहिजे. – जयदीप ननावरे व प्रवीण अजबे, संस्थापक, कृषी संघटना कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, पुणे</strong>
कृषी पदवीधरांचा अकृषी क्षेत्राकडे करिअरसाठी वळण्याचे प्रमाण कल अधिक आहे. त्यांना शासकीय योजनांच्या कामाची नीट समज कार्यप्रशिक्षणातून झाली, तर ते कृषी शासकीय नोकरी, कृषी क्षेत्रामध्ये वळण्यास मदत होईल. – ए. बी. गाताडे, कृषी विभागप्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे.