कोल्हापूर : आम्हीही शिवसेनेकडून निवडणूक लढवलेली होती. आता भाजपात असलो म्हणून कोणी महत्व देणार नसेल तर चालणार नाही. सन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचार करणार नाही, असे म्हणत मयूर सहकारी उद्योग समूहाचे नेते संजय पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा होती. खासदार धैर्यशील माने यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपचे केंद्रीय रासायनिक खत मंत्रालयाचे संचालक, पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष संजय पाटील, आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांचे बंधू संजय पाटील तसेच भाजपचा घटक पक्ष असलेले मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले होते. अखेर महायुतीने पुन्हा धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवायचे ठरवलेले आहे. हेही वाचा : काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश असे असताना शिरोळ तालुक्यात मयूर सहकार समूहाचे संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अनिल उपाध्ये, सतीश पाटील, सयाजी पाटील, दीपक रानमाळे, राजकुमार चौगुले, मेजर सुनील पाटील, माजी सभापती बंडू कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त करून गटाला सन्मान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संजय पाटील म्हणाले, लोकसभा उमेदवारी मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. आधीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सव्वातीन लाख मते मिळवली आहेत. आता भाजपमध्ये असले म्हणून सन्मान द्यायचा नाही ही भूमिका चालणार नाही. इतरांच्या गाठीभेटी घेतल्या जात असताना दुर्लक्ष केले जात आहे. आमच्याकडे विविध पक्षातील मानणारे कार्यकर्ते असताना सर्वांना सन्मान मिळत नाही तोवर प्रचार केला जाणार नाही.