कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच महायुतीचे नेते एकवटले असताना भाजपकडून दोन्ही खासदार व पालकमंत्री यांना जुनी काँग्रेस मैत्री विसरा असा परखड संदेश देण्यात आला. महापालिका, सहकारी संस्था येथील राजकीय संबंधांना रामराम करावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात राजकारणाच्या बरोबरीने सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांची टोकाचे अंतर राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पातळीवरील राजकारणात राजकारणाच्या पलीकडे मैत्र राहिले असल्याचे आणि त्यामध्ये भाजपही अनेकदा गोवला असल्याचे अनेक दाखले इतिहासात आहेत.

महायुतीतील उमेदवारीच्या स्पर्धेवर मात करत खासदार मंडलिक यांनी बाजी मारल्यावर नाराजी नाट्य दूर होऊन भाजप कार्यलयात महायुतीचे नेते एकत्र आल्याचे दर्शन घडले. निवडणूक काळात उमेदवार, प्रमुख नेते यांचे हात दगडाखाली अडकलेले असल्याची संधी साधून त्यांनी फटकावण्याची संधी साधली जाते. भाजपचे प्रदेश सचिव, देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी हे काम नेटाने केले. यापुढे काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे गुणगान कोणीही गाता कामा नये. अगदी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही जुनी मैत्री विसरली पाहिजे. गोकुळ, जिल्हा बँक, महापालिका येथे सोबत आणि दुसरीकडे विरोध असे राजकारण चालणार नाही, असे त्यांनी परखडपणे ऐकवले.

हेही वाचा : शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी

दुसरीकडे, खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून त्यांच्या व आमदार सतेज पाटील यांच्यातील संबंधांवर टीकेची झोड उठवली. जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांना दुखवून चालत नाही या माने यांच्या विधानाकडे लक्ष वेधण्यात आले. आज भाजपची मदत घेऊन उद्या काँग्रेसच्या नेत्यांचे गुणगान गाणार असाल तर यापुढे ते चालणार नाही. तसे असेल तरच मते मागायला आमच्या दारात या, अशी अट भाजप समर्थकांनी घातली आहे.

भाजपने व्यक्त केलेल्या या अपेक्षा प्रत्यक्षात कितपत उतरणार हा वादाचा मुद्दा आहे. लोकसभा- विधानसभा या निवडणुकीच्या राजकारणामध्ये पक्षांच्या थेट सामना होत असतो. त्यामध्ये विचारसरणीचा मुद्दा महत्त्वाचा असतो. पडद्यामागील राजकारण वगळले तर मंचावरून पक्षाचा पुरस्कार करणे राजकीय नेत्यांना भाग पडत असते. याचा अनुभव कोल्हापूर जिल्ह्यात सतत येत गेला आहे. तथापि सहकार व स्थानिक संस्थांच्या राजकारणात भिन्न पद्धतीचे राजकारण पाहायला मिळते. या पातळीवर बहुदा सोयीचे राजकारण केले जाते. पक्षीय भूमिकेपेक्षा व्यक्तिगत संबंधाच्या भूमिकेला अधिक महत्त्व दिले जाते. महापालिका असो की गोकुळ, जिल्हा बँक, शेतकरी संघ, बाजार समिती अशा महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय संबंधापेक्षा राजकीय नेत्यांच्या व्यक्तिगत संबंधांना महत्त्व असते. त्या दृष्टीनेच आघाड्या होत असतात.

हेही वाचा : निवडणूक रायगडची प्रचार मात्र मुंबईत

शिवाय अशा आघाडीमध्ये उमेदवारी देत असताना संबंधित नेत्याकडे मतांचा गट्टा किती मोठा याचाच प्रामुख्याने विचार केला जातो. पुरेसे मतदान नसेल तर त्याचा फटका कसा बसतो हे सत्ताधाऱ्यांसोबत राहूनही खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आवाडे यासारख्या बड्या नेत्यांनी गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनुभवले आहे. म्हणूनच जिल्हा बँकेच्या निवडणूक वेळी खासदार मंडलिक यांना पणन मतदारसंघात निवडणूक लढवताना बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यासारख्या कार्यकर्त्याच्या मदतीवर निवडून यावे लागले होते. ते जाहीरपणे कबूल करून मंडलिक यांनी मनाचा मोठेपण दाखवला होता. इतकेच नाही बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही सोयीची आघाडी करत विविध पक्षांना सोबत घेतले होते. अनेक नगरपालिकांमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष, सभापतीपदे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या सहकार्यामुळेच मिळाली आहेत. जिल्ह्याच्या सहकार पटलावर अद्यापही भाजपने पुरेशी ताकद कमावलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही साधारण असेच चित्र आहे. त्यामुळे महेश जाधव यांनी कितीही अपेक्षा व्यक्त केल्या असल्या तरी सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोयीच्या राजकारणाचे प्रकरण मागील पानावरून पुढे सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. प्रश्न आहे तो अशाने भाजप कार्यकर्त्यांना या पातळीवरील राजकारणात त्यांना अपेक्षित सोन्याचे दिवस कधी येणार याचाच !