कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात कोल्हापूरकरांना मंगळवारी पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळी आली. पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड झाल्याने महापालिकेला शहरात २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला.गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी तीन फुटाने वाढली होती. नदीत मुबलक पाणी असले तरी काळम्मावाडी नळपाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी व मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहिला.

परिणामी पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागली. महापालिकेच्या ४ व खासगी १७ टँकरद्वारे निम्म्या शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला.काळम्मावाडी योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार असून रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजेंद्रनगर व कळंबा जलशुद्धीकरण केंद्राजवळील खराब व्हॉल्व्ह महापालिकेच्या यंत्रणेने आज बदलले.