कोल्हापूर : प्राप्तिकर विभागाची भीती घालून भाजपात प्रवेश देण्याची गरज नाही. मुळात तुम्हालाच तुमच्या लोकांना सांभाळता येत नाही, त्याला आम्ही काय करणार, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तोफ डागली. सुरुवातीच्या काळात पर्याय नव्हता, म्हणून नेते पक्षांतर करत नव्हते. आता सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असा दावा त्यांनी केला.
चंदगड तालुक्याचे नेते , माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी येथे भाजपमध्ये प्रवेश केला, त्या प्रसंगी ते बोलत होते.
‘शरद पवार यांनी पत्रकार बैठक घेऊ न प्राप्तिकर विभाग, इडी यांच्याकरवी कारवाई करण्याची भीती घालून लोकांना भाजपात घेतले जात आहे, असे विधान केले आहे,’ असा उल्लेख करून मंत्री पाटील यांनी पवार यांच्या विधानाची खिल्ली उडवली. ‘कु णालाच पुढे येऊ द्यायचे नाही, ही तुमची परंपरा आहे. बारामती लढवायला तुम्हाला मुलगीच लागते, मावळ लढवायला पार्थ लागतो. महाराष्ट्रात सतत तुम्ही वर्षांनुवर्षे घराणेशाही चालवली. मुळात भाजप कु णालाही अशाप्रकारची भीती घालत नाही.तरीही उगाचच आमच्यावर आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महिनाअखेरीस मोठा बॉम्ब
काँग्रेसच्या कार्यशैलीवर टीका करून पाटील म्हणाले,की राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दोनशे ते अडीचशे घराण्याने गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राला लुटला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही झाल्यामुळेच लोक आता पक्षांतर करत असल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीत भाजपचे मजबूत सरकार सत्तेवर येणार आहे. त्यानंतर ज्याने महाराष्ट्र लुटला त्या सर्वाचा हिशोब चुकता केला जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. येत्या ३१ तारखेला मुंबईमध्ये मोठे बॉम्ब फुटणार आहेत, दर दहा दिवसांनी सतत बॉम्ब फुटत राहणार असल्याचा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.