कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. तर कोल्हापूर महापालिकेने सोमवारपासून युद्ध कक्ष (वॉर रूम) सुरू केला आहे. शहरात जलजन्य दूषित पाण्याने आजाराचे प्रमाण वाढल्याने घरोघरी पाहणी केली जात आहे. मेच्या अखेरच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात महापूर नियंत्रण यंत्रणा गतिमान करण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सलग आठवड्याहून अधिक काळ पाऊस पडत आहे. दररोज मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली आहे. पश्चिम भागात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह रुई, इचलकरंजी, येवलूज, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधारा येथे पाणी १८ फुटांवर आहे.
विकास पाण्यात बुडाला
मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील गांधी मैदानाचे रूपांतर तळ्यात झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे गांधी मैदान पाण्याने काठोकाठ भरले आहे. सुमारे ५.३० कोटी रुपये खर्च करून येथे विकासकामे केल्याचा दावा लोकप्रतिनिधी, कोल्हापूर महापालिका यांच्याकडून केला जात असला तरी पहिल्याच पावसात ही विकासकामे पाण्यात बुडाली असल्याने त्यावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या तळ्यातील पाणी काढण्याचे काम आज प्रशासनाने सुरू केले होते.
मदत कक्ष सुरू
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात मध्यवर्ती युद्ध कक्ष (सेंट्रल वॉर रूम) आजपासून सुरू करण्यात आला आहे. महापालिकेने यापूर्वी अग्निशमन विभाग, चारही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेसाठी व पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी मदत कक्ष सुरू केले आहेत. यामध्ये विभागीय कार्यालय गांधी मैदान, छ.शिवाजी मार्केट, राजारामपुरी, छ.ताराराणी मार्केट येथे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
आरोग्य तपासणी सुरू
पावसाचा जोर वाढत असल्याने कोल्हापूर शहर परिसरामध्ये कीटकजन्य व जलजन्य दूषित पाण्याने आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून बाधित क्षेत्रांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. कावीळ या आजाराचे रुग्ण शहर परिसरामध्ये काही भागांत आढळत आहेत. सोमवारी शाहूनगर चांदीचा गणपती या परिसरामध्ये चार कावीळ रुग्ण आढळले असून उपचार घेतल्यावर ते बरे झाले आहेत. बाधित क्षेत्रामध्ये साथरोग विभागामार्फत १४५ घरांत ५९५ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. १० पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.