लोकसत्ता विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : शासकीय योजनांसाठी संकलित केलेला डाटा खाजगी कॉल सेंटर कडे उपलब्ध होणे ही गंभीर बाब आहे. शिवाय त्या माध्यमातून भाजप व पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख करीत प्रचार सुरू आहे. या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, गेल्या दोन-तीन दिवसापासून उज्वला गॅस योजना, पीएम किसान योजना या संदर्भातील दोन्ही ध्वनीमुद्रीत संदेश समाज माध्यमात अग्रेषित होत आहेत. खाजगी कॉल सेंटरकडून संबंधित लाभार्थींना दोन्ही ध्वनिचित्रफीत पाठवताना त्यामध्ये भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख केला आहे. वास्तविक शासकीय योजनांसाठी संकलित केलेली माहिती ही शासकीय मालकीची असते. पण ती खाजगी कॉल सेंटर आणि विशिष्ट पक्षाकडे कशी उपलब्ध झाली हा गंभीर मुद्दा आहे. भाजपच्या या प्रचार पद्धतीवर करून आमदार पाटील यांनी संशय व्यक्त करीत तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. आणखी वाचा-बालविवाह रोखण्यासाठी विवाहकार्यात सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई करा- रुपाली चाकणकर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप योग्य रीतीने आणि गतीने सुरू आहे. या उलट महायुतीमध्ये गडबड आहे. ती हळूहळू बाहेर पडेल. जागा वाटपाबाबत हुकमी एक्का महाविकास आघाडीकडे आहे, असेही विधान त्यांनी केले. राज्याच्या इतिहासात विधिमंडळ परिसरात हाणामारीच्या घटना कधी घडल्या नाहीत. आता सत्ताधारी आमदारांमध्ये हाणामारी होणे हे परंपरेच्या दृष्टीने वाईट आहे. अशा महत्त्वाच्या घटना घडूनही त्याचे सीसीटीव्ही नोंदणीचे तपशील उपलब्ध नसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे पाटील यांनी नमूद केले.