दयानंद लिपारे, लोकसत्ता कोल्हापूर : राजकीय भवितव्याची चिंता लागलेल्या शिवसेनेच्या माजी आमदारांमध्ये उमेद पेरण्याचे काम शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यातून केली. लोकसभा, विधानसभा, कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला सज्ज राहण्याची प्रेरणा मिळाली. मात्र महाविकास आघाडीचे निवडणूक लढण्याचे गणित जोवर निश्चित होत नाही; तोवर शिवसेनेचे संख्याबळ पूर्वीसारखे होण्याची शक्यता सोपी नाही. लोकसभा, महापालिका निवडणुकीलाही हेच सूत्र लागू होणारे आहे. कोल्हापूर शिवसेनेत सध्या उत्साहाचे वातावरण आहे. संजय पवार यांना थेट राज्यसभेची उमेदवारी पक्षाने जाहीर केल्याने नेतृत्वाने दखल घेतली अशीच शिवसैनिकांमध्ये भावना आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंपर्क अभियाननिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी पक्ष मेळाव्यात जिल्ह्यातील शिवसेनेच्या विधिमंडळातील घटलेल्या संख्याबळाबद्दल चिंता व्यक्त केली. एकवरून पुन्हा सहा आमदार करण्याचा प्रयत्न आगामी विधानसभा निवडणुकीत केला जाईल. याच वेळी महापालिका निवडणूक आमचे ठरलेय, पैशाची मस्ती असे संदर्भ देत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावरही नाव न घेता तोफ डागली. संकल्प आणि पूर्ततेत अडचणी शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ वाढवण्याचे सुतोवाच राऊत यांच्या प्रमाणे यापूर्वी कोल्हापुरात आलेल्या शिवसेनेच्या नेते, संपर्कमंत्री, संपर्कप्रमुख, संपर्क नेते अशा अनेकांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही पक्षाला पक्षविस्तार करण्याचा अधिकार आहे; हेच सूत्र महाविकास आघाडीने ठेवले आहे. त्यानुसार राऊत यांनी केलेल्या या विधानात तसे नवे काही नव्हते. पण माजी आमदार बनलेल्यांना पुन्हा आमदार बनण्याचे वेध लागावे अशी प्रेरणा त्यांच्या भाषणातून मिळाली. मात्र, संकल्प आणि पूर्तता यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत याची जाणीव राऊत आणि माजी आमदारांना नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरावे. आगामी लोकसभा, विधानसभा या मविआ की स्वबळावर याबद्दल अद्याप कसलीही स्पष्टता नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापुरात बोलताना पुढील निवडणुका आघाडी एकत्रित लढवेल असे विधान केले होते. पण दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने त्याचा इन्कार केला होता. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेनेला विद्यमान राधानगरीची आणि शाहूवाडीत पराभूत झालेल्या अशा दोनच जागा मिळू शकतात. कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले व शिरोळ या चार जागा आघाडीच्या जागावाटपात तत्त्वानुसार प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात. जागावाटपाच्या तत्त्वावरच शिवसेनेला उमेदवारी मिळणार नसेल तर संख्याबळ पूर्ववत करणे हा भाबडेपणा ठरू शकतो. आघाडीऐवजी स्वबळ आजमावण्याचे ठरवले तरी शिवसेनेला या ६ मतदारसंघांमध्ये दोन्ही काँग्रेससह भाजपशी सामना करावा लागणार आहे. अशी लढत सेनेने जिंकणे हे राऊत यांना वाटते तितके सहज नाही. जिल्ह्यातील अन्य चार मतदारसंघातही शिवसेनेचे इच्छुक गुडघ्याला बािशग लावून तयार आहेत. त्यावर राऊत काही बोलत आहेत, ना शिवसेनेच्या नेतृत्वाकडून काही भाष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिलेली आहे ती वेगळीच. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शाहू महाराज यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. मित्रपक्षांना डिवचताना .. ल्लपालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या राजकारणावर राऊत यांनी तिखट हल्ला चढवला. काँग्रेसचे आमदार असतानाही सतेज पाटील यांनीच संजय मंडलिक यांच्या बाजूने रान उठवले. त्यातून कोल्हापूरची लोकसभेची जागा जिंकण्याचे बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे स्वप्न साकार झाले. कोल्हापूर, हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह उभय काँग्रेसच्या ८ आमदारांना वगळून शिवसेनेच्या जागा स्वबळावर निवडून आणणे कितपत शक्य आहे?. याच्या खोलात जाण्याचे राऊत यांनी टाळले आहे. निकालाचे गणित कसे जमणार यावर त्यांनी विवेचन केले असते तर ते शिवसेनेच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकणारे ठरले असते. शिवसेना अशा विश्लेषणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न कधी करीत नाही. ल्लकोल्हापूर महापालिका जिंकण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याप्रमाणे भाजपनेही कंबर कसली आहे. आता महापौर करण्याच्या दृष्टीने शिवसेना झटणार असेल तर त्यासाठी ताकद कोण आणि किती पणाला लावणार, पक्ष अंतर्गत गटबाजीचे काय करणार या नावडत्या विषयाला राऊत यांनी स्पर्श केला नाही. नियोजनाचे मांडणी न करता थेट ध्येय गाठण्याची राऊत यांची घाई दिसून आली. तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे, असे विधान करून भाषणबाजीचा फड जिंकता येतो. पण निवडणुकीचा फड जिंकणे सोपे नाही; हे राऊत यांना कोण समजवणार हा प्रश्न उरतोच.