कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण रस्ते जलमय होऊन गेले. शहरातील एका शाळेची संरक्षण भिंत कोसळली. तर एक शालेय मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मान्सूनची सलामी अशी हादरवून टाकणारी ठरली. कोल्हापुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारनंतर जोरदार मेघगर्जना सुरू झाली. विजांचा कडकडाट पोटात भीतीचा गोळा आणणारा होता. पाठोपाठ पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने काही काळातच रस्ते जलमय झाले. सकल भागांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पावसामुळे नोकरदार, प्रवाशांची तारांबळ उडाली. मुलगा वाहून गेला दरम्यान सरनोबतवाडी ते मनेर मळा परिसरातील ओढ्यात एक शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेची भिंत कोसळली

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराला लागून असलेल्या दक्षिण दरवाजाकडे प्रिन्स इंदुमती प्रशालेची संरक्षण भिंत पावसामुळे कोसळली. तीन वर्षांपूर्वी या शाळेची भिंत कोसळल्याने –चहा विक्रेत्यांच्या गाड्याचे मोठे नुकसान झाले होते. या शाळेची संरक्षण भिंत मातीची असून त्यावर सिमेंटचा कठडा वाढवलेला आहे. हे बांधकाम धोकादायक ठरू शकते. शाळा सुरू असताना याच भिंतीखाली मुली उभ्या असतात. यामुळे शाळा व्यवस्थापनाने या संरक्षण भिंतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.