भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री हिची आशियाई खेळांसाठी भारतीय बॅडमिंटन संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने आशियाई खेळांसाठी भारताच्या २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, मात्र या निर्णयाविरुद्ध आता आवाज उठू लागला आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता शहरात आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष संघाचे नेतृत्व किदम्बी श्रीकांतकडे तर महिला संघाचे नेतृत्व सायना नेहवालकडे सोपवण्यात आले आहे.

मात्र या संघातून अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अपर्णा बालन हिच्यासह वैष्णवी रेड्डी हिलाही वगळण्यात आले आहे. या प्रकरणी अपर्णा हिने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बाई) आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, कन्या गायत्री गोपीचंद आणि आकर्षि कश्यप यांच्याविरोधात केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यातच भर म्हणून आता वैष्णवी हिच्या आजीने पुलेला गोपीचंद, BAI यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे गोपीचंद यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वैष्णवीच्या आजीने केलेल्या याचिकेत म्हटले आहे की वैष्णवीला या संघातून जाणूनबुजून वगळण्यात आले आहे. गोपीचंद यांच्या कन्येला संघात स्थान मिळावे, म्हणून असे करण्यात आले आहे. गायत्री गोपीचंद ही जागतिक क्रमवारीत पहिल्या ३०० बॅडमिंटनपटूंमध्येही नसताना तिला संघात स्थान देण्याचा हट्ट असल्याने वैष्णवीला वगळण्यात आले असलायचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, ३१ वर्षीय अपर्णा हिने २९ जून २०१८ रोजी दाखल केलेल्या याचिकेत तिला संघातून वगळण्यात येणे हे अयोग्य आहे, असे म्हटले आहे. आपली कन्या गायत्री हिला संघात स्थान मिळावे, या कारणास्तव मला या संघातून वगळण्याचा निर्णय पुलेला गोपीचंद यांनी घेतला असल्याचेही आरोप तिने या याचिकेत केले आहेत.

त्यामुळे गायत्री गोपीचंद हिच्या संघातील समावेशामुळे आता गोपीचंद यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.