१५ सप्टेंबरपासून होणाऱ्या आशियाई चषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची आज घोषणा केली. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देत, बीसीसीआयने रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. शिखर धवनकडे या संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलंय. या संघात राजस्थानच्या खलिल अहमदला जागा मिळाली आहे. खलिल अहमदच्या कारकिर्दीबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. जयपूरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या टोंक गावात खलिल अहमदचा जन्म झाला. खलिलचे वडील हे कपांऊंडर म्हणून काम करत होते, खलिलने क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवण्यासाठी त्यांचा विरोध होता. मात्र प्रशिक्षकांनी समजूत काढल्यानंतर खलिल क्रिकेट खेळायला लागला. सुरुवातीच्या काळात खलिल टेनिस बॉलने सिमेंटच्या पिचवर सराव करायचा. २०१६ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात खलिलची भारतीय संघात निवड झाली होती. इशान किशनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात खलिल खेळला होता. या स्पर्धेत खलिलने ६ सामन्यात ३ बळी मिळवले होते. १९ वर्षाखालील भारतीय संघात खलिलला राहुल द्रविड यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. २०१७ साली टी-२० क्रिकेटमध्ये खलिलने राजस्थानकडून प्रथमश्रेणी सामन्यात पदार्पण केलं. २०१८ च्या आयपीएल हंगामात सनराईजर्स हैदराबादने खलिलवर ३ कोटी रुपयांची बोली लावली होती. भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खान हा आपला आदर्श असल्याचं खलिलने याआधीच मान्य केलं आहे. मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खलिलने तेज-तर्रार मारा केला होता. या स्पर्धेत खलिल १४८ च्या वेगाने गोलंदाजी करत होता. नुकत्याच बंगळुरुत पार पडलेल्या चौरंगी मालिकेत खलिल सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर होता.