कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कांगारुंना दिलेल्या धक्क्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे सामन्यात बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३४१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी आश्वासक झाली नाही. मात्र यानंतरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार पुनरागमन करत भारताला चांगली झुंज दिली. तरीही मोक्याच्या क्षणी कुलदीप आणि शमीने एकाच षटकात दोन बळी घेत कांगारुंना बॅकफूटवर ढकललं. ऑस्ट्रेलियाचा संघ ३०४ धावांपर्यंतच माजल मारु शकला. ३६ धावांनी सामना जिंकत भारताने या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या सामन्यात झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार फिंच आणि स्मिथ यांनी छोटेखानी भागीदारी रचत भारताला झुंज दिली. मात्र रविंद्र जाडेजाने फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. तरीही ऑस्ट्रेलियाने मैदानात तग धरत लढा सुरु ठेवला स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन या फलंदाजांनी आपल्या ठेवणीतले फटके खेळत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणण्यास सुरुवात केले. हे दोन फलंदाज भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच लाबुशेन जाडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली. यष्टीरक्षक कॅरी माघारी परतल्यानंतर खेळपट्टीवर तग धरुन राहिलेला स्मिथही त्रिफळाचीत झाला. केवळ दोन धावांनी स्मिथचं शतक हुकलं. त्याने १०२ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ९८ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तग धरु शकले नाही. शमी, सैनी यांनी एकाच षटकात कांगारुंना दणके देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून मोहम्मद शमीने ३ बळी घेतले. त्याला नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने एक बळी घेत चांगली साथ दिली. त्याआधी, सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत लोकेश राहुल यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर राजकोट वन-डे सामन्यात भारतीय संघाने ३४० धावांचा पल्ला गाठला. पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या वन-डेत भारतीय फलंदाजांची कामगिरी सुधारलेली पहायला मिळाली. कांगारुंकडून फिरकीपटू झॅम्पा आणि रिचर्डसन या गोलंदाजांना सामन्यात यश मिळालं. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला ४२ धावांवर बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शिखर धवन आपल्या शतकापासून ४ धावा दूर असताना रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही. यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्येच्या दिशेने नेलं. यादरम्यान विराट कोहलीने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. विराट आपलं शतक झळकावणार असं वाटत असतानाच झॅम्पाने त्याचा अडसर दूर केला. त्याने ७८ धावांची खेळी केली. यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर सामन्यात संधी मिळालेला मनिष पांडेही झटपट माघारी परतला. दरम्यान लोकेश राहुलने अष्टपैलू रविंद्र जाडेजाला सोबत घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला ३४० धावांचा टप्पा गाठून दिला, त्याने ८० धावा केल्या.