करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरुन क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्यावर टिका होत आहे. या वादामुळे दोघांनाही ऑस्ट्रियाला दौऱ्यावरून तडकाफडकी मायदेशात बोलवण्यात आले आहे. अनेक बडे ब्रॅण्डसने त्यांच्या दोघांबरोबरच करारही रद्द कण्याचा विचार करत आहेत. एकंदरितच त्यांच्या करियरवरच प्रश्न चिन्ह उभे राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. असे असतानाच भाजपाचे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी मात्र या दोघांची बाजू घेत बीसीसीआयमधील वरिष्ठांनी योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘कॉफी विथ करण’मधील प्रकरणानंतर बीसीसीआयने दोघांना चौकशीसाठी भारतामध्ये बोलवून घेतले आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने सहा जणांच्या एका गटाची स्थापना केली आहे. दोघांवर काय करावाई करावी यासंदर्भातील अहवाल लवकरच या सहा सदस्यीय समितीकडून बीसीसीआयला देण्यात येईल. तपास पूर्ण होईपर्यंत पांड्या आणि राहुल यांना बीसीसीआय, आयसीसी तसेच कोणत्याही राज्यस्तरीय क्रिकेट मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानंतर या दोघांवर काही महिन्यांची बंदी घालण्यात आली तरी त्यांना आयपीएल २०१९ आणि वर्ल्डकप स्पर्धा खेळता येणार नाही. प्रशासकीय समितीच्या सदस्या असणाऱ्या डायना इड्यूलजी यांनी दोन्ही खेळाडूंना वर्ल्डकपमध्ये खेळता येणार नाही असे संकेत दिले आहेत. मुंबई मीररला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दोन्ही खेळाडूंना वर्ल्डकप स्पर्धेला मुकावे लागले का? असा प्रश्न विचारण्यात आला असता डायना यांनी ‘लागू द्या’ असं उत्तर दिले.

एकीकडे या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच डायना यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या वादात आता थेट केंद्रिय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी उडी घेत डायना यांच्यावर दोन्ही खेळाडूंचे करियर संपवण्याबद्दल टिका केली आहे. एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल दम देणे आणि त्या व्यक्तीलाच संपवणे यामध्ये एक अस्पष्ट सिमारेषा आहे हे प्रशासकिय समितीच्या सदस्यांनी लक्षात घ्यायला हवे असे मत सुप्रियो यांनी ट्विटवरुन मांडले आहे.

,डायना आणि त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करत मला असं वाटतय की एवढ्या टोकाचा विचार करणाऱ्या डायना यांची विचारसणी पुरातन आहे. हार्दिकचे वक्तव्य खेदजनक आहेच. मात्र अशी प्रकरणांमध्ये वरिष्ठांनी तरुणांना हाताळताना विवेकबुद्धीने निर्णय घेणे गरजेचे असते’, असे मत सुप्रियो यांनी आपल्या ट्विटमध्ये मांडले आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल दम देणे आणि त्या व्यक्तीलाच संपवणे यामध्ये एक अस्पष्ट सिमारेषा आहे. माझी या सर्व वरिष्ठांना एकच विनंती आहे की आपल्या वयाला शोभेल असं वागा. इतकं बोलून मी थांबतो.’

दरम्यान काही नेटकऱ्यांनी सुप्रियो यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले असून अनेकजण या प्रकरणावर ओव्हर रिअॅक्ट करत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तर काहींनी दोन्ही खेळाडूंची चूक अक्षम्य असल्याचे मत मांडताना त्यांना कठोर शिक्षा व्हावी असं मत नोंदवलं आहे.