T20 World Cup IND vs SL Live : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत भारताचा आज अखेरचा साखळी सामना श्रीलंकेशी सुरू आहे. कर्णधार चमिरा अटापटू (३३) आणि दिलहारी (नाबाद २५) यांच्या खेळीमुळे श्रीलंकेने ११३ धावांचा टप्पा गाठला आणि भारताला ११४ धावांचे आव्हान दिले. श्रीलंकेच्या इतर फलंदाजांनी निराशा केली असली तरी, कर्णधार चमारी अटापटू हिने एख विक्रम केला. चमारीने ३३ धावांची खेळी करत टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये ५०० धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिली श्रीलंकन महिला क्रिकेटपटू ठरली.

दरम्यान, सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकला. दिप्ती शर्माने डावाच्या सुरूवातीलाच भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दिप्तीनं उमेशा थिमासीनीला दोन धावांवर बाद केलं. त्यानंतर चांगली भागीदारी होत असतानाच १७ चेंडूत १२ धावा करणारी हर्षिता माधवी त्रिफळाचीत झाली. राजेश्वरी गायकवाड निर्धाव षटक टाकत तिचा बळी टिपला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने चांगली सुरूवात करत ३३ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, पण मोठा फटका मारताना ती झेलबाद झाली.

अटापटू बाद झाल्यावर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. आधी हसीनी परेरा ७ धावांवर माघारी परतली. पाठोपाठ करूणरत्ने (७) आणि सिरीवर्धने (१३) दोघी झटपट बाद झाल्या. लगेचच अनुष्का संजीवनीही १ धाव काढून पायचीत झाली. त्यामुळे शंभरीच्या आत श्रीलंकेचे सात गडी माघारी परतले. निलाक्षी डी सिल्वा आणि दिलहारी यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरला. पण अखेर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात सिल्वा (८) माघारी परतली. अखेरच्या टप्प्यात दिलहारीने नाबाद २५ धावा करून श्रीलंकेला ११३ धावांपर्यंत पोहोचवले. राधा यादवने ४, राजेश्वरी गायकवाडने २ तर शिखा, पूनम आणि दिप्तीने १-१ बळी टिपला.