बीसीसीआयच्या स्पर्धांमध्ये पंचांना देण्यात येणारे मानधन स्थानिक खेळाडूंच्या उत्पन्नापेक्षाही जास्त असल्याचे बोर्डाचे माजी सचिव निरंजन शाह यांनी लक्षात आणून दिले आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, केरळ क्रिकेट असोसिएशन व नॅशनल क्रिकेट क्लब या सदस्य संस्थांनी 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची आणि स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना व सामनाधिकाऱ्यांना जास्त मानधन देण्याची मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी याप्रकरणी नोटिस जारी केली असून नवी दिल्लीमध्ये 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. बोर्डाच्या अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीने 12 एप्रिलच्या बैठकीत पंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टॉपच्या 20 पंचांना टी-20 वगळता बीसीसीआयच्या अन्य सामन्यांमध्ये प्रतिदिन 40 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. तर टी-20 सामन्यांसाठी त्यांना सध्याच्या 10 हजारांच्या जागी 20 हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे.

तर प्रथम श्रेणीच्या स्थानिक सामन्यांसाठी क्रिकेटपटूंना प्रतिदिन 35 हजार रुपये देण्यात येतात. त्यामुळे आता अंपायर्स या खेळाडूंपेक्षा जास्त कमावतील असे चित्र निर्माण झाले आहे. पंचांचं व अन्य कर्मचाऱ्यांचं उत्पन्न वाढणं ही चांगली बाब असली तर त्यांचं उत्पन्न खेळाडूंपेक्षा जास्त असणं ही धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे. क्रिकेटपटूंपेक्षा अंपायर्सचं मानधन जास्त कसं काय असू शकतं हे आपल्याला समजूच शकत नाही अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

त्यातही गेल्या स्थानिक स्पर्धांच्या मोसमापासून रणजी ट्रॉपीमध्ये प्रत्येक संघाला दोन सामने कमी खेळायला मिळतात, यामुळेही खेळाडूंचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये खेळाडूंचे करार, स्थानिक क्रिकेटपटूंचे व सामनाधिकाऱ्यांचे मानधन हे विषय मुख्य अजेंडावर असणार आहेत.