आयपीएल २०२१मध्ये भाग घेतलेले खेळाडू आणि टीव्ही प्रॉडक्शनचे सदस्य सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचल्याची माहिती क्रिकेट वेस्ट इंडिजने दिली आहे. आयपीएलचा हा हंगाम करोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आला. लीगचे २९ सामने खेळवल्यानंतर अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आयपीएलला तहकूब करावे लागले. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआय आणि फ्रेंचायझी यांच्यासमोर सर्व खेळाडूंना सुखरूप घरी परत पाठविण्याचे मोठे आव्हान होते. परदेशी खेळाडूंना घरी परत पाठविणे इतके सोपे काम नव्हते. हळूहळू सर्व खेळाडू आपापल्या देशात पोहोचत आहेत. वेस्ट इंडिजचे खेळाडूही त्यांच्या भूमीवर पोहोचले आहेत. वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतात आणि त्यांचे खूप योगदान असते. "आमचे आयपीएलमधील खेळाडू आणि जे टीव्ही प्रॉडक्शनचे सदस्य सर्वजण सुरक्षितपणे पोहोचले आहेत. सर्वोत्तम आणि सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझीचे आम्ही आभार मानतो", असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने ट्वीटमध्ये म्हटले. "Our IPL players, along with the West Indians who were part of the TV production, are now safely back in the Caribbean. We are grateful to the @BCCI and IPL Franchises for arranging their safe travel back to the Caribbean so quickly." - CWI CEO @JohnnyGrave @KKRiders pic.twitter.com/68ftnHRATq — Windies Cricket (@windiescricket) May 9, 2021 ड्वेन ब्राव्हो, सुनील नरिन, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन असे विंडीजचे स्टार खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतात. वेस्ट इंडीज व्यतिरिक्त इतर देशांचे खेळाडूदेखील त्यांच्या घरी पोहोचत आहेत. अलीकडेच पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने ट्विट केले होते, की त्यांचे सर्व खेळाडू सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले आहेत.