आजपासून (9 एप्रिल) आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होत असून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने बायो बबलबाबत भावना व्यक्त केल्या. करोना महामारीनंतर बदलेल्या जीवनशैलीबद्दल त्याने आपली प्रतिक्रिया दिली.  अशा वातावरणात खेळायला मिळणे म्हणजे क्रिकेटपटू नशिबवान असल्याचे मत रोहितने व्यक्त केले.

”करोना काळात सामान्य माणूस जगण्यासाठी धडपड करत आहेत. जीवन जगणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आम्हाला क्रिकेट खेळायला मिळतंय हे आमचं भाग्यच आहे. आम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागेल”, अशा भावना रोहित शर्मा याने व्यक्त केल्या आहेत.

 

”आयपीएलच्या १३व्या पर्वात आम्ही यूएईत बायो बबलमध्ये होतो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा आणि इंग्लंड संघ भारतात आला तेव्हाही आम्ही बायो बबल वेळ घालवला आहे. बायो बबलमध्ये आम्हाला एकमेकांना जाणून घेता आलं”, असेही रोहित शर्माने सांगितले.  मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवर रोहित शर्माचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. करोनानंतर क्रिकेटपटूंची जीवनशैली कशी बदलली याबाबत रोहित शर्मा या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.

या व्हिडिओत रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही उल्लेख केला आहे. ‘आयपीएलच्या मागच्या हंगामात मला दुखापत झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा माझ्यासाठी आव्हानात्मक होता. तिथे मी काही सामने खेळू शकलो नाही. मात्र आमच्या सांघिक खेळामुळे विजयश्री खेचून आणला. युवा खेळाडुंनी जबाबदारी घेतली आणि विजय मिळवला”, असेही रोहितने सांगितले.

महाराष्ट्राच्या तीन कबड्डीपटूंना करोनाची लागण

आयपीएलसाठी एकूण बारा बायो बबल तयार करण्यात आलेत. त्यापैकी आठ हे फ्रेंचायजी आणि सहाय्यक कर्मचार्‍यांसाठी आहेत. दोन बबल सामना अधिकारी आणि सामना व्यवस्थापन संघासाठी असतील. तर, दोन बबल प्रसारण समालोचकासांठी असणार आहेत.