पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर सध्या भारतीय संघावर चांगलीच टीका होते आहे. अशातच दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहली पाठदुखीमुळे फलंदाजीसाठी मैदानात उशीरा उतरला होता. यामुळे दुसऱ्या डावात विराटला फारशी चमकदार कामगिरीही करता आलेली नव्हती. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत विराटच्या सहभागावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र विराट आपल्या दुखापतीमधून पूर्णपणे सावरला असून तिसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होणार असल्याचं समजतंय. नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर १८ ऑगस्टपासून तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर विराटने आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली होती. कामाच्या दबावामुळे आपल्याला पाठीचा त्रास होत असतो, मात्र येत्या ५ दिवसांत मी बरा होऊ शकतो. यानुसार विराटच्या प्रकृतीत सुधारणा झालेली असून तिसऱ्या कसोटीत विराट पुन्हा एकदा भारताचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.