‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे सध्या बंदीची शिक्षा भोगत असलेल्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलसाठी, आयपीएलचे संघमालक धावून आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघातून हकालपट्टी झाल्यानंतर आता आयपीएलमध्ये दोघांना खेळता यावं यासाठी बीसीसीआयने दोघांबद्दल तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी संघमालक करत आहेत. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स तर लोकेश राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतो.

23 मार्च पासून आयपीएलच्या बाराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. ‘InsideSports’ ने दिलेल्या वृत्तानुसार एका संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण दोन्ही खेळाडूंनी केलेल्या वक्तव्याशी जराही सहमत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र या खेळाडूंना संघात जागा न देण्याचं कारणही नसल्याचं अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. त्यामुळे बीसीसीआयने फेब्रुवारी पर्यंत या दोन्ही खेळाडूंबद्दल निर्णय घेतल्यास आम्हाला सरावासाठी वेळ मिळेल. संघ खेळाडूंनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाहीये, मात्र यावेळी व्यवस्थापन खेळाडूंवर करडी नजर ठेवणार आहे, त्यामुळे त्यांच्यातला बदल तुम्हाला पहायला मिळेल. अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर आपली प्रतिक्रीया दिली. त्यामुळे बीसीसीआय आता या दोन्ही खेळाडूंबद्दल काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.