२०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला चेतेश्वर पुजारा भारतीय कसोटी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. वन-डे क्रिकेटमध्ये मात्र पुजाराला आतापर्यंत फारशी संधीच मिळाली नाही. आतापर्यंत पुजाराने फक्त ५ सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटचा फलंदाज असा शिक्का बसलेल्या पुजाराचा वन-डे क्रिकेटसाठी फारसा विचार केला जात नाही. भारतीय संघाचे माजी फिरकीपटू दिलीप दोषी यांच्या मते चेतेश्वर पुजाराला वन-डे संघात संधी न देणं अन्यायकारक आहे. मी पुजाराला वन-डे संघातून कधीच काढलं नसतं. एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना दोषी यांनी आपलं मत मांडलं.

“मी पुजाराला माझ्या वन-डे संघातून कधीच काढलं नसतं. मी त्याला सांगितलं असतं तू एक बाजू सांभाळ आणि ५० षटकं फलंदाजी करत रहा. माझ्यामते त्याच्यात ही क्षमता आहे. पुजारा वन-डे क्रिकेटसाठी संथ फलंदाज म्हणणं दुर्दैवी आहे. मला असं काही ऐकलं की खूप वाईट वाटतं. टी-२० क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून खेळ पूर्णपणे बदलून गेला आहे. माझ्यामते क्लब क्रिकेट खेळणारा प्रत्येक खेळाडू आजच्या घडीला चांगलं टी-२० क्रिकेट खेळू शकतो. आजच्या घडीचे अनेक फलंदाज तंत्राकडे लक्ष देत नाही, म्हणून फिरकीपटूंना खेळताना त्यांना त्रास होतो.” दोषींनी आपलं मत मांडलं.

२०१९ विश्वचषकादरम्यान पुजाराला भारतीय वन-डे संघात स्थान द्यावं का यावर चर्चा सुरु होती. मात्र कालांतराने तो विषय मागे पडला. कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा चेतेश्वर पुजारा भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे. मात्र वन-डे संघात त्याला येत्या काळात संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.