ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन अखेरीस पुढे ढकलण्यात आलेलं आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीने याबद्दल आज अधिकृत घोषणा केली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसी विचार करत होतं, परंतू यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

१८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन केला. मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियन सरकारने नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतू रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाउन घोषित केलं आहे. परंतू देशातली एकंदर परिस्थिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावरचं आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं जाणं ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती.

दरम्यान २०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल असंही आयसीसीने जाहीर केलं आहे.

टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयसमोर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली होती, फक्त आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा जाहीर करण्याची वाट बीसीसीआयला पहायची होती. आज आयसीसीने घोषणा केल्यानंतर लवकरच बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल अधिकृत घोषणा करेल.