ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरु होणार आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोनही संघाने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरी कसोटी जिंकून मालिकेत निर्णायक आघाडी घेण्याच्या दृष्टीने दोनही संघ मैदानात उतरणार आहेत. अशा वेळी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्यात वरचढ ठरण्यासाठी एक पर्याय सांगितला आहे.

मी स्वतः आक्रमक फलंदाज आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये मी चौथ्या किंवा पाचव्या स्थानी खेळायला येतो. त्यावेळी मला सामन्याची स्थिती पाहून त्यानुसार खेळावे लागते. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज उत्तम वेगाने गोलंदाजी करतात. त्यामुळे या गोलंदाजीविरुद्ध खेळताना खेळपट्टीवर स्थिरावण्यात वेळ न घालवता सरळ त्या गोलंदाजीवर आक्रमण करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे रहाणे म्हणाला.

काही वेळा तुम्हाला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घ्यावा लागतो. चेतेश्वर पुजारा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पण मी चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. माझ्यासारख्या फलंदाजांनी काजी वेळ जोखीम घ्यायला हवी आणि आक्रमक पवित्र घ्यायला हवा, असे रहाणेने स्पष्ट केले.

पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत कशा पद्धतीचा खेळ करावा याबाबत मी आधीच मनात पक्के केले होते. फलंदाजांनी आपल्या मनात ठरवलेले खेळपट्टीवर जाऊन खेळायला हवे. कारण जर तुम्ही जोखीम घेऊ शकला नाहीत, तर गोलंदाज वरचढ ठरेल, असेही रहाणेने नमूद केले.